तुम्ही आ बैल मुझे मार ही म्हण ऐकली असेलच. सचिन पायलट यांचं धोरण अगदी तसंच आहे. मागील तीन ते सहा महिन्यांपासून ते असंच वागत आहेत. रोज ट्विट करणं, कॅबिनेटमध्ये विरोधात भूमिका घेणं हेच त्यांचं धोरण आहे अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता भाजपासोबत जातील किंवा नवा पक्ष काढला तरीही भाजपाला साथ देतील हे यांचं ठरलं आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं. हे करताना आम्हाला आनंद नाही झाला नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असंही गेहलोत म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून रचलं होतं सरकार पाडण्याचं षडयंत्र”, गंभीर आरोप

आणखी वाचा- उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यामुळे हा करीश्मा घडवणाऱ्या सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली ती अशोक गेहलोत यांच्या गळ्यात. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. ज्यामुळे नाराज असलेल्या पायलट यांनी अखेर गेहलोत सरकारविरोधात बंड पुकारत २५ आमदारांना बाजूला काढलं आहे. गेहलोत सरकारकडे बहुमत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं गेल्यानंतर सत्याला तुम्ही कधीही पराभूत करु शकत नाही असं एका ओळीचं ट्विट सचिन पायलट यांनी केलं.

आणखी वाचा- “गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर…”; उमा भारतींची तिखट प्रतिक्रिया

याबाबत अशोक गेहलोत यांन विचारलं असता त्यांनीही सचिन पायलट यांच्यावर टीका केली आहे. सचिन पायलट यांचं धोरण गेल्या सहा महिन्यांपासून आ बैल मुझे मार असं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.