पीटीआय, नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या आठवडय़ात नवउद्यमींच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) बुडल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित उद्योग क्षेत्रातील भारतीय नवउद्यमी संकटात सापडले आहेत. त्यासंबंधीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. अमेरिकेत राहून सॉफ्टवेअर सेवा प्रदान करणारे बहुसंख्य नवउद्यमी आणि फर्म यांची खाती एसव्हीबीमध्ये होती, त्यांना ही बँक बुडाल्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एसव्हीबी बंद पडल्याचा जगभरातील नवउद्यमींवर निश्चितच विपरीत परिणाम होणार आहे. नवीन भारताच्या अर्थव्यवस्थेत या नवउद्यमी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल आणि केंद्र सरकार त्यांना या संकटात कशा प्रकारे मदत करू शकेल हे जाणून घेण्यासाठी आपण या आठवडय़ात भारतीय नवउद्यमींची भेट घेणार आहोत असे चंद्रशेखर यांनी रविवारी ट्वीट करून सांगितले. बहुसंख्य नवउद्यमींच्या कर्मचाऱ्यांचे वेतन एसव्हीबीशी वाय कॉम्बिनेटर मार्फत दिले जाते, त्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मात्र, काही नवउद्यमींचे वेतन मीशो, रेझरपे आणि कॅशफ्री पेमेंट यांच्यामार्फत दिले जाते. त्यांना या संकटाची झळ बसणार नाही असे सांगण्यात आले.