पश्चिम बंगालमध्ये जाणून बुजून लोकसभा निवडणुका लांबवल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच इथल्या निवडणुका लांबवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लांबवल्याने प्रचंड उन्हामुळे, उकाड्यामुळे उमेदवार आणि मतदारांना त्रास होणार आहे. तसेच रमजानच्या पवित्र महिन्यात मतदान आल्याने रोजा ठेवण्याऱ्या मुस्लिम मतदारांनाही यामुळे त्रास होणार आहे.

मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्यांच्यावरच उलटणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ममता म्हणाल्या, सात टप्प्यात मतदानाची घोषणा केवळ बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातच करण्यात आली आहे. ही तीन राज्येच केंद्रात कोणाचे सरकार येणार हे निश्चित करणार आहेत.