काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आपली भूमिका मांडली. लोकसभेचं विशेष अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिलंच विधेयक मांडलं गेलं ते महिला आरक्षणाचं विधेयक आहे. त्यावर आज चर्चा होते आहे. अशात सोनिया गांधी यांनी या विधेयकावरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.

सोनिया गांधी नेमकं काय म्हणाल्या?

धूर होणाऱ्या स्वयंपाक घरात काम करण्यापासून ते स्टेडियमच्या झगमगाटापर्यंत पोहचलेल्या भारताच्या स्त्रीची वाटचाल खूप मोठी आहे. मात्र अखेर तिने शिखर गाठलं आहे. भारताची स्त्री मुलं जन्माला घालते, कुटुंब चालवते, पुरुषांच्या स्पर्धेच्या जगात ती त्याच्या खांद्याला खांदा मिळवून चालते आहे, प्रचंड धैर्य बाळगून तिने हे सगळं यश संपादन केलं आहे. अनेकदा तिची वाट बिकट प्रयत्नांची होती, पण तिने शेवटी प्रगती केली आहे हे मान्य करावंच लागेल.

भारतीय स्त्रीच्या सहनशक्तीत महासागराचं बळ आहे. तिने कधीही तिच्याबरोबर झालेल्या बेईमानाची तक्रार केली नाही. तसंच स्वार्थी विचार केला नाही. एखादी नदी वाहात जाते आणि सगळ्यांना आपलंसं करते तसं तिने सगळ्यांना आपलंसं केलंय. संकट आलं तेव्हा ती हिमालयासारखं खंबीर राहिली आहे. भारतीय स्त्री आराम करत नाही, तसंच थकणंही तिला ठाऊक नाही. आपल्या भारतालाही आपण भारतमाता म्हणतो. मात्र स्त्रीने फक्त आपल्याला जन्म दिलेला नाही. तर आपले अश्रू, रक्त आणि घाम गाळून आपल्याला शक्तिशाली केलं आहे हे विसरता येणार नाही.

आपल्या देशातल्या स्त्रियांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही

स्त्रीची मेहनत, तिची ताकद आणि तिचा आदर यांची परिभाषा आपण जाणली तरच आपण माणुसकीची आव्हानं पेलू शकतो. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. आशा, अपेक्षा, स्वार्थ यांच्या ओझ्याखाली ती दबून राहिली नाही. सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, अरुणा असफअली, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमारी पंडित कौर यांच्यासह लाखो महिलांनी आजपर्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांची स्वपं साकार केली आहेत. इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व हे भारतीय स्त्री कशी आहे याचं उत्तम उदाहरण आहे. माझ्या आयुष्यातलाही हा मार्मिक क्षण आहे. पहिल्यांदा स्त्रियांना राजकारणात स्थान देण्यासाठीचं विधेयक सर्वात आधी माझे दिवंगत पती राजीव गांधी घेऊन आले होते. ते बिल मंजूर झालं नाही मात्र नंतर नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते मंजूर झालं. त्यामुळे आज १५ लाख स्त्रिया या विविध महिला प्रतिनिधी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी किती वर्षे वाट बघायची?

आज जे आरक्षण बिल आणलं जातं आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. हे बिल मंजूर झाल्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र एक चिंताही आम्हाला आहे. मागच्या १३ वर्षांपासून भारतीय स्त्रिया आपल्या राजकीय जबाबदारीची वाट बघत आहेत. आता त्यांना आणखी काही वर्षे वाट पाहा सांगितलं जातं आहे, त्यांनी किती वर्षे वाट बघायची, दोन वर्षे, चार वर्षे की आठ वर्षे? भारताच्या स्त्रियांशी ही वागणूक योग्य आहे का? त्यामुळे आमची काँग्रेस म्हणून ही मागणी आहे की हे विधेयक तातडीने अंमलात आणलं जावं. तसंच जातनिहाय जनगणना करुन शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणाची तरतूदही सरकारने केलं पाहिजे. त्यासाठीच्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत. हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारने आणखी वेळ काढू नये. कारण तसं झालं तर तो राजकारणातल्या स्त्रियांवरचा सर्वात मोठा अन्याय असेल. मी सरकारकडे मागणी करते की नारीशक्ती बंधन अधिनियम हा कायदा सगळ्या अडचणी दूर सारुन लवकरात लवकर लागू करा. हे करणं सरकारला खूप सहज शक्य आहे असं म्हणत सोनिया गांधींनी भूमिका मांडली आहे.