स्त्री-पुरुष समानतेच्या देशात आजही मुलगी नको म्हणून प्रयत्न केले जात आहेत. गर्भलिंग तपासणी बेकायदा असल्याने मुलगा जन्माला यावा म्हणून इतर कथित पारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो. शरीरसंबंध केव्हा प्रस्थापिक करावे, त्याची दिशा कशी असावी, वेळ काय असावी, अशा अनेक असिद्धांतिक गोष्टींवर लोकांचा विश्वास असतो. त्यानुसार मुलगा जन्माला येण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, तरीही असे प्रयत्न अनेकवेळा अपयशी ठरतात. परिणामी संबंधित महिलेला दोष देऊन तिचा मानसिक छळ केला जातो. असाच प्रकार केरळसारख्या सर्वाधिक सुशिक्षित राज्यात घडला आहे. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनीही संताप व्यक्त केला आहे. मुलगा कसा जन्माला येतो? एवढंच नव्हे तर चांगला मुलगा कसा जन्माला येतो, याबाबतची सविस्तर माहिती एका नववधूला तिच्या सासरच्यांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री दिली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी ही महिला गर्भवती राहिली. या महिलेला मुलगाच होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतू या महिलेला मुलगी झाली. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. हा छळ सहन न झाल्याने तिने थेट केरळच्या हायकोर्टात धाव घेतली आहे. या महिलेने पतीसह तिच्या संपूर्ण सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हेही वाचा >> सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून बदल; डोनर गेमेट वापरण्याची मुभा, आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना काय फायदा? संबंधित महिलेला शरीरसंबंध ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. तसंच, कोणत्या वेळी शरीरसंबंध ठेवल्यास चांगला मुलगा होईल, याविषयीही सांगण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर मुली म्हणजे अतोनात खर्च असतो. त्यामुळे मुलगाच झाला पाहिजे, अशी तंबीही तिला सासरच्यांनी दिली होती. सासरच्यांनी दिलेल्या सूचनांनुसार शरीरसंबंध ठेवल्यानंतरही तिला मुलगी झाली. मुलगी झाल्याने तिला सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून ती त्रास सहन करतेय. अखेर या महिलेने सासरच्यांविरोधात केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली. संघटनांकडून मदत न मिळाल्याने गेली थेट कोर्टात याचिकाकर्ता महिलेचं वय ३९ वर्षे असून ती केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणारी आहे. तिचं लग्न एप्रिल २०१२ मध्ये झालं होतं. लग्नानंतर तिला मुलालाच जन्माला घालायचे आहे, अशी धमकीही देण्यात आली होती. पण, तिला मुलगी झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा मानसिक छळ सुरू केला. गेल्या अनेक वर्षांपासून ती सासरच्यांचा त्रास सहन करतेय. याप्रकरणात तिने अनेक संघटनांसाठी संपर्क साधला. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे ही महिला उच्च न्यायालायत गेली. तिचं हे प्रकरण ऐकताच न्यायधीशांनीही संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले, "केरळसारख्या राज्यातही अशा घटना घडतात हे पाहून मला धक्का बसला आहे." या प्रकरणावर कोर्टाने राज्य आणि केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.