तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि भाजपामध्ये (BJP) जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक हैदराबादमध्ये झाली. यावेळी भाजपाने पक्षाचा दक्षिण भारतात विस्तार करण्यावर भर दिला. यावेळी तेलंगणाच्या सत्ताधारी टीआरएस पक्षाने पंतप्रधान मोदींवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. टीआरएस प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोळशाच्या प्रश्नावर मोदींना घेरलं. यानंतर टीआरएसने मोदी व भाजपाला तेलंगणातील विकास समजला नसल्याचा आरोप केला. तसेच मोदी व भाजपाला समजणाऱ्या भाषेत माहिती देत असल्याचं म्हणत ट्वीट मालिका पोस्ट केली. यावर भाजपाने उर्दूत टीआरएसच्या अपयशाची यादी देत प्रत्युत्तर दिलं. टीआरएसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "मोदींना आणि त्यांच्या पक्षाला तेलंगणा राज्यात टीआरएस पक्षाने केलेला विकास समजून घेता आला नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही तेलंगणाने काय यश प्राप्त केलंय ते पंतप्रधान मोदींच्या आवडीच्या भाषेत माहिती." यानंतर टीआरएसने ट्वीटची मालिका पोस्ट करत गुजराती भाषेत तेलंगणाची १५ वैशिष्ट्ये सांगितली. तसेच त्यांचं तेलंगणामध्ये स्वागत केलं. टीआरएसने तेलंगणाची सांगितलेली १५ वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे; १. भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे चौथे राज्य२. दरडोई उत्पन्नाचा सर्वाधिक वृद्धी दर३. भारतातील सर्वात वेगाने आयटी क्षेत्र वाढवणारे राज्य४. शेतकऱ्यांना रोख मदत आणि विमा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य५. शेतकऱ्यांना २४/७ मोफत वीज पुरवणारे भारतातील एकमेव राज्य६. सर्वाधिक धान/भाताचे उत्पादन करणारं राज्य७. जगातील सर्वात मोठा 'लिफ्ट ईरिगेशन प्रोजेक्ट' असलेलं राज्य८. दरडोई वीज उपलब्धतेमध्ये भारताचा सर्वोच्च विकास दर असलेलं राज्य९. भारतात सौरऊर्जा उत्पादनात सर्वात मोठे चौथे राज्य१०. भारतातील टॉप २० गावांपैकी १९ गावे असलेले राज्य११. वनक्षेत्र सर्वात जास्त वाढवणारे राज्य१२. १०० टक्के घरांमध्ये गॅस कनेक्शन असलेले पहिले राज्य१३. आरोग्य सेवेत भारतातील अव्वल राज्य१४. भारतातील सर्वात सामंजस्यपूर्ण राज्य१५. जगातील सर्वात मोठे 'इनोव्हेशन कॅम्पस' असलेले राज्य टीआरएसच्या या ट्वीटवर तेलंगणा भाजपाने प्रत्युत्तर देत टीआरएस सरकारच्या अपयशाची यादी ट्वीट केली. यात शेतकरी आत्महत्येपासून कर्जबाजारीपणापर्यंतचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. हेही वाचा : “मोदी त्यांच्या सावकार मित्रांच्या कोळसा खरेदीसाठी राज्यांवर दबाव टाकत आहेत”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप मागील काही दिवसांपासून टीआरएस आणि भाजपाने एकमेकांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. भाजपाच्या विस्तारात पुढील राज्य तेलंगणाचा क्रमांक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच मागील काही काळात अगदी महानगरपालिकेच्या निवडणूक काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये दौरे केले. आता मोठ्या कालावधीनंतर होणारी राष्ट्रीय कार्यकारणी बैठकही तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ठेवली. त्यामुळे या दोन्ही पक्षातील हा राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.