सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक कऱण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे.

याच प्रकऱणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आली आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांच्या संमतीने ही अटक कऱण्यात आली. याबद्दल आता सीबीआयच्या कोलकत्त्याच्या कार्यालयाबाहेर तृणमूल कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहे. आता या कार्यकर्त्यांनी सीबीआयच्या कार्यालयावर दगडफेक कऱण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच राज्यपाल जगदीप धनकर यांनी ट्विट करत अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे ममता यांनी राज्यातल्या शांतता व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असं आवाहनही केलं होतं.

कार्यकर्त्यांच्या निदर्शनामुळे कोलकत्त्यामधल्या सीबीआय कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार आता बंद कऱण्यात आलं आहे. तर कार्यालयाच्या परिसरात फौज तैनात कऱण्यात आली आहे. यावरुन राज्यपाल धनकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांचं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. तृणमूल काँग्रेसकडून सीबीआयने केलेल्या अटकेविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. तृणमूलने कोलकत्त्याच्या पोलिस आयुक्तांना याविषयीचं पत्र दिलं आहे. तसंच सीबीआय फक्त भाजपा आणि राज्यपाल यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोपही केला आहे.

आणखी वाचा- मंत्र्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींनी घेतली सीबीआय़ कार्यालयात धाव

तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत शांतता राखण्याचं आणि लॉकडाउनच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे हा हिंसाचार ममता बॅनर्जी यांनीच घडवून आणला असल्याचा आरोप भाजपा खासदार दिलीप घोष यांनी केला आहे.