ईशान्येकडील मणिपूर राज्य अद्यापही धुमसतंच आहे. आज शनिवारी दुपारी ३.५० वाजता मणिपूरच्या मोहरेहमध्ये अज्ञात बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाला. सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी आयईडी आणि इतर स्फोटकांचा वापर केला. या हल्ल्यानंतर राज्य सुरक्षा दलांनी हल्लेखोरांनाही प्रत्युत्तर दिले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मोरेहून की लोकेशन पॉइंट (KLP) कडे जात असताना पोलीस कमांडो घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. तर, “इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहनोऊ गाव विभाग ओलांडताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. या हल्लात पोलीस कर्मचारी जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर ५ आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत”, असे अधिकाऱ्याने सांगितले.
प्राथमिक अहवालानुसार, न्यू मोरेह प्रवेशद्वार आणि एम चहनो गावाजवळ अंदाधुंद गोळीबार सुरू होता. मोरेह येथेही दोन घरांना आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >> मणिपूरमधील प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी उपायांची माहिती द्या! सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
गेल्या महिन्यातही घडला होता हिंसाचार
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात अज्ञात सशस्त्र लोकांनी केलेल्या हल्ल्यात एक भारतीय राखीव बटालियन (IRB) जवान आणि एक नागरिक ठार झाला होता. हा हल्ला हाराओथेल आणि कोबशा गावांदरम्यान झाला.
मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आल्यानंतर ३ मे २०२३ पासून ईशान्येकडील मणिपूर राज्य वांशिक हिंसाचाराच्या गर्तेत आहे.
मणिपूरमधील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली
मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेचं वर्णन करताना गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, आपण हा एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. यूएनएलएफने आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ईशान्येत कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करता येणार आहे. मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे.