पीटीआय, गुणा अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला आणि मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले. मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शहा बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल. शहा यांनी काँग्रेसवर राम मंदिराचे बांधकाम रोखल्याचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसने नेहमीच आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिर बांधले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधला, बाबा महाकाल लोक बांधले त्याचबरोबर सोमनाथ मंदिर सोन्याने बनवले जात आहे.’’ पंतप्रधानांनी बद्रीनाथ धाम आणि केदारधामचेही पुनरुज्जीवन केले, असेही त्यांनी नमूद केले. शहा पुढे म्हणाले की, रामलल्ला ५५० वर्षांपासून ‘अपमानित’ अवस्थेत होते. काँग्रेस ७० वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत होता आणि विलंब करत होता.