ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांवर कायमच विरोधकांकडून टीका केली जाते. त्यांना कायम सरकारच्या पिंजऱ्यातले पोपट असंही म्हटलं जातं. आता ईडी कारवाया किती प्रमाणात होत आहेत? याची टक्केवारीच अमित शाह यांनी सांगितली. काय म्हणाले अमित शाह? "आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून कोट्यवधी रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल? तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का? ईडीने जेवढ्या कारवाया केल्या. त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर ९५ टक्के इतर लोक आहे. पण अफवा पसरवली जात आहे. जे लोक भ्रष्टाचार करत आहेत, तेच लोक हा भ्रम पसरवत आहेत" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. "भाजपात कुणीही आले असले तरी कुणाचीही केस भाजपाने मागे घेतली नाही. काँग्रेसने दहा वर्षात भ्रष्टाचार केला होता. त्यांच्या सरकारने सीबीआय चौकशी लावली होती. कशासाठी चौकशी लावली होती. कॉमनवेल्थवर कुणी चौकशी केली तर काँग्रेसने केली. काँग्रेसने त्यांच्या सरकारात त्यांच्याच विरोधात ४० केसेसमध्ये चौकश्या लावल्या होत्या. तेव्हा कुणाचं सरकार होतं. ईडीने जे लाखो रुपये जप्त केलं आहे, तो ब्लॅक मोहिमचा भाग आहे. ९५ टक्के काळा पैसा इतरांचा आहे. तर ५ टक्के पैसा फक्त राजकारणाचा आहे" असंही अमित शाह म्हणाले आहेत. १० वर्षांत १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार काँग्रेसने केला आहे. आपल्या देशात न्यायालय आहे. काँग्रेसमध्ये सर्वाधिक चांगले वकील आहेत. त्यांनी खुशाल न्यायालयात जावं असंही अमित शाह म्हणाले आहेत. टीव्ही ९ नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमात अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. “रिलीजिअस मायनॉरिटीला नागरिकत्व देण्याचं नेहरूचं स्वप्न होतं. आम्ही ते पूर्ण केलं. आम्ही काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. तीस वर्षानंतर आम्ही नवं शैक्षणिक धोरण आणलं. ४० वर्षापासून महिलांच्या आरक्षणाची चर्चा होती. कोणी देत नव्हतं. आम्ही महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. त्यांचा धोरणांमध्ये सहभाग आणला. न्याय संहिता, नागरिक संहिता, भारतीय साक्ष संहिता आम्ही इंग्रजांचे कायदे रद्द केले. राम मंदिर उभारलं”, असं अमित शाह म्हणाले.