पीटीआय, धार देशात घुसखोरांना रोखण्याचे साहस फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आहे. काँग्रेस आणि ‘इंडिया’ या विरोधी आघाडीच्या नेत्यांमध्ये ती हिंमत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले. ‘मोदीजींनी देशात घुसखोरांना रोखण्याचे काम केले असून, काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना तसे करता येणे शक्य नाही. घुसखोरांना रोखायला हवे की नाही’, असा प्रश्न १७ नोव्हेंबरला निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील मनावर येथे जाहीर सभेत शहा यांनी विचारला. हेही वाचा >>>पवित्र नात्याला काळीमा! जुगारात पत्नीला हरल्यानंतर तिला तसंच सोडून घरी परतला पती, दिल्लीत गहाण ठेवलं..आणि.. जम्मू- काश्मीरमध्ये घटनेचा अनुच्छेद ३७० रद्द केल्यास रक्तपात होईल असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला असतानाही मोदी सरकारने हे पाऊल उचलले, मात्र काहीच घडले नाही, असे शहा म्हणाले. काँग्रेस पक्ष देशाची संस्कृती नष्ट करत असल्याचा आरोप करतानाच, मोदी सरकारने संस्कृतीचे पोषण आणि संवर्धन केले, असे शहा यांनी सांगितले. २०१८ सालच्या निवडणुकीनंतर मध्यप्रदेशात १५ महिने सत्तेवर असताना ‘तीर्थ दर्शन योजनेसारख्या’ अनेक कल्याणकारी योजना थांबवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर ठपका ठेवला आणि भाजपला मते देण्याचे आवाहन केले.