पीटीआय, नवी दिल्ली

काश्मीरमध्ये अवलंबिण्यात आलेले क्षेत्रीय वर्चस्व आणि शून्य दहशतवाद धोरण जम्मू विभागातही काटेकोरपणे राबविण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी अधिकाऱ्यांना दिली. नवी दिल्लीमध्ये जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत त्यांनी दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तुलनेने शांत असलेल्या रियासी जिल्ह्यात गोळीबारानंतर वैष्णोदेवी यात्रेकरूंची बस दरीत कोसळून अपघात झाला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सर्वप्रकारचे उपाय योजण्याचे आदेश दिले. रविवारी शहा यांनी घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने जम्मू विभागाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण राज्यात दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर काश्मीरप्रमाणेच जम्मूमध्येही योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे शहा यांनी यावेळी नमूद केले. २९ तारखेपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावाही यावेळी घेण्यात आला. बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी व गुप्तहेर संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.