बिगर कॉंग्रेसी राज्य सरकारांना केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोलकात्यात केला. पश्चिम बंगालच्या दौऱयावर असलेल्या मोदी यांनी तेथील कार्यक्रमात केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आणि तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कामाची स्तुती केली. 
देशात ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता नाही. तेथील राज्य सरकारांबरोबर यूपीए सरकार दुजाभाव करीत आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्याही सरकारला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे मोदी यांनी सांगितले. केंद्रामध्ये जेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळी कधीही आपल्याला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील तत्कालिन सरकारने केला नव्हता, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
आपल्या भाषणात मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे तोंडभरून कौतुक केले. डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमधील ३२ वर्षांच्या कार्यकाळात विकासप्रक्रियेत खूप मोठे खड्डे तयार करून ठेवले आहेत. ते भरून काढण्यासाठी बॅनर्जी यांना वेळ द्यावा लागेल. बॅनर्जी यांचे सरकार राज्यातील जनतेच्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यूपीए सरकारच्या काळात देशातील विकास ठप्प झाला आहे, अशी टीकाही मोदी यांनी यावेळी केली.