उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे एक भीषण अपघात झाला आहे. लग्नाला जात असलेल्या वऱ्हाडाची ईको कार कालव्यात पडून अपघातग्रस्त झाली आणि कारमधील सहा प्रवासी बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. या अपघातामुळे लग्नमंडपात शोकाचं वातावरण पसरलं आहे. या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका लग्नासाठी ककोडमधील शेरपूर गावावरून वऱ्हाड निघालं. हे वऱ्हाड अलीगडला जाणार होतं. वऱ्हाडातील सहाजण एका ईको कारमध्ये बसले. रविवारी रात्री ही कार कपना गावातील कालवा ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावरुन जात होती. त्याचवेळी चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कर थेट कालव्यात कोसळली आणि कारमधील सहा प्रवासी पाण्यात बुडाले. कार कालव्यात कोसळल्यानंतर शेजारच्या गावातील रहिवाशांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या अपघातामुळे लग्नमंडपात शोकाचं वातावरण निर्माण झालं. काकोडच्या शेरपूर गावातील रहिवासी रॉबिनचं रविवारी अलीगडमधील पिसावा येथे लग्न होणार होतं. रॉबिनचा भाचा मनीष (२२) त्याच्या कुटुंबीयांना घेऊन कारने अलीगडकडे रवाना झाला. कारमध्ये मनीषची बहीण कांता (२४), अंजली (२०), आत्याचा मुलगा प्रशांत (१८), भाची (१७) आणि कैलास (४२) मनीषबरोबर प्रवास करत होते. ही कार जहांगीरपूरच्या कपना शहराजवळ पोहोचली. कपना येथील कालव्यावर असलेल्या पुलावरून जाताना मनीषचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार कालव्यात कोसळली. पुलावरून प्रवास करणाऱ्या इतर लोकांनी पोलीस, बचवा पथक आणि शेजारच्या गावातील लोकांना या अपघाताबाबतची माहिती दिली. हे ही वाचा >> नरेंद्र मोदींमुळेच प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकीट नाकारलं? खुद्द प्रज्ञासिंह म्हणाल्या, “कदाचित…” स्थानिक गावकरी, पोलीस आणि बचाव पथकाने नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली. बचाव पथकाला आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून तीन जण बेपत्ता आहेत. मनीष, कांता आणि अंजली या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर, प्रशांत, किशोर आणि एका मुलीचा शोध घेतला जात आहे.