उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचं हत्यासत्र चालू असल्याचं समोर आलं आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल नऊ महिलांची हत्या झाल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. विशेष म्हणजे या सर्व महिलांची हत्या साडी किंवा ओढणीने गळा आवळून करण्यात आली आहे. एकाच प्रकारे महिलांच्या हत्या होत असल्यामुळे पोलीस बुचकळ्यात पडले असून हा मानसिक स्थिती बिघडलेला हल्लेखोर असावा, असा पोलिसांना संशय आहे. या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी बरेली पोलिसांनी दोन पथकं तैनात केली आहेत. नेमकं काय घडतंय बरेलीमध्ये? उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील हत्यासत्राची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. या हत्यासत्रामुळे महिला दहशतीच्या छायेखाली असून पोलिसांवर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी दबाव येऊ लागला आहे. बरेलीच्या शिशागढ व शाही अदी या भागांमध्ये प्रामुख्याने या हत्या होत आहेत. नुकतीच एका ५५ वर्षीय महिलेच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उर्मिला देवी गंगवार असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. रविवारी दुपारी जनावरांसाठी चारा गोळा करायला त्या घराबाहेर पडल्या होत्या. पण दुपारपर्यंत त्या परतल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पतीने शोध घ्यायला सुरुवात केली. घरापासून काही अंतरावर त्यांना पत्नीच्या फुटलेल्या बांगड्या आढळल्या. तिथूनच काही अंतरावर त्यांना उर्मिला देवी यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जखम झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. “अंजू पाकिस्तानात तोंड काळं करुन आली आहे, आता अरविंद…”, मुलीचं नाव ऐकताच संतापले वडील ५ महिने, ९ हत्या! गेल्या पाच महिन्यांत अशाच प्रकारे ९ हत्या झाल्याची बाब पोलिसांच्या चिंतेत भर टाकणारी ठरली आहे. विशेष म्हणजे सर्व हत्यांमध्ये एकसमान धागे दिसून येत आहेत. या हत्या मध्यमवयीन ते वृद्ध अशा महिलांच्या होत आहेत. शिवाय सर्व हत्या साडी किंवा ओढणीने गळा आवळून करण्यात आल्या आहेत. शिशागढ व शाही अदी या परिसरातच या हत्या होत असल्यामुळे तो विकृत मारेकरी याच भागात फिरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मारेकऱ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तैनात केली आहेत. त्यातील एक पथक प्रत्यक्ष हत्यांचा, घटनास्थळाचा तपास करेल तर दुसरं पथक या सर्व मृत महिलांशी संबंधित व्यक्तींची चौकशी करेल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.