Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाची साथ सोडली असून ते सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (एनडीपीपी) सामील झाले आहेत. त्यामुळे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या पक्षाचं विधानसभेतील संख्याबळ वाढलं असून एनडीपीपीला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात आमदारांनी पक्षाची साथ का सोडली? याचं कारण काय? या संदर्भातील माहिती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं कारण अजित पवारांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीच्या त्या ७ आमदारांबाबत अजित पवार काय म्हणाले?
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या सात आमदारांबाबत बोलताना अजित पवार काय म्हणाले की, “गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार मला भेटायला आले होते. त्या आमदारांची तेथे काहीही कामे होत नव्हती. त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांबरोबर मी देखील बोललो होतो. त्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे. पण आज आणि काल दोन दिवस मी आजारी होतो. त्यामुळे आता मी नागालँडमधील त्या आमदारांबाबत अधिक माहिती घेत आहे. पण सातही आमदार सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे तेथे पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
महिलेला साखळदंडाने बांधलेल्या घटनेबाबत अजित पवार काय म्हणाले?
छत्रपती संभाजीनगर येथे एका मुलीला चटके दिल्याची घटना समोर आली. या घटनेबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मला तमाम लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की आपण नियम आणि कायदे महिलांच्या बाजूने केलेले आहेत. त्यामुळे महिलांनी अशा घटना घडल्या तर तक्रारी केल्या पाहिजेत. आता कोल्हापूरात एक अशीच घटना घडली. एका महिलेला साखळदंडाने बांधलं होतं. त्यानंतर याबाबत काही लोकांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि महिलेची सुटका केली. मात्र, त्या महिलेच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्या महिलेची मानस्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी ते कृत्य केलं. मात्र, जर मानसिक स्थिती चांगली नसेल तर मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजे होते. पोलीस आणखी त्याबाबत तपास करत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातील अपघाताच्या घटनेवर अजित पवार काय म्हणाले?
“पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका कारनं ११ विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या अपघाताबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी सकाळी आल्यानंतर सर्वात आधी या घटनेची माहिती घेतली. त्या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे होते. त्या कारची चावी मालकाकडून तशीच राहिली आणि पुढे कार चालकाकडून ही घटना घडली. तो चालक मद्यधुंद होता. आता या प्रकरणात एकाला रात्री अडीच वाजता अटक करण्यात आलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.