सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातात दार्जिलिंग हिल्समधील तकदाह येथील रहिवासी हवालदार सतपाल राय यांनीही जगाचा निरोप घेतला. हवालदार सतपाल यांच्या पत्नीने सांगितले की, हेलिकॉप्टर अपघातापूर्वी त्यांचे पत्नीशी दोनदा बोलणे झाले होते. सतपाल राय यांनी सांगितले होते की, मला लवकर निवृत्ती घ्यायची आहे. पण जेव्हा त्यांनी सीडीएस रावत यांच्याशी याबद्दल मत व्यक्त केले तेव्हा त्यांनी “सतपाल, तू आणि मी एकत्र निवृत्ती घेऊ,” असे म्हटले होते.

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी हवालदार सतपाल राय यांचाही तामिळनाडूमधील कुन्नूर येथे मृत्यू झाला. सतपाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या टेकडा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. हवालदार सतपाल यांची ८० वर्षीय आई त्यांच्या मृतदेहाची वाट पाहत आहे. राय यांना लवकर निवृत्ती घ्यायची होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांची पत्नी मंदिरा राय म्हणाल्या, “सतपाल यांना लवकर निवृत्ती घ्यायची होती, पण जनरल रावत यांनी २०२४ मध्ये ते एकत्र निवृत्त होणार असल्याचे सांगून त्यांना जाऊ दिले नाही.”

“सतपाल यांनी वेलिंग्टनला पोहोचल्यानंतर तुला पुन्हा फोन करतो असे म्हटले होते. मी त्यांना शेवटचे पाहिले तेव्हा दिवाळी होती. घरी आल्यावर त्यांनी निवृत्त होऊन व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. मी माझा नवरा गमावला आहे पण मला त्याचा अभिमान आहे. ते देशासाठी शहीद झाले,” असे सतपाल यांच्या पत्नी मंदिरा राय यांनी म्हटले.

सतपाल यांचे वडील बहादूर सिंग राय हेही लष्करात होते. सतपाल यांचा भाऊ बिकल राय हा देखील ५/११ गोरखा रायफल्समध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच देशसेवेसाठी काम करत आहे.

ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुन्नूर विमान अपघातात सतपाल राय यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. “स्व. हवालदार सतपाल राय यांच्या वयाच्या ४० व्या वर्षी झालेल्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करते. राय यांनी मातृभूमीसाठी आपले जीवन समर्पित केले. पर्वतांच्या या शूर पुत्राचे निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. बंगालचे शूर सुपुत्र सतपाल राय यांचे बलिदान नेहमी लक्षात ठेवा. काल त्या दु:खद अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्व संरक्षण जवानांच्या कुटुंबियांसाठी मी मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.