इन्स्टाग्राम हे तर हल्ली सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे. मात्र याच इन्स्टाग्राममुळे सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा एका महिलेला शोध लागला आहे. विशेष बाब म्हणजे तिचा पती दुसऱ्या महिलेसह करुन सुखाने राहतो आहे. पतीचं हे रील पाहून सदर महिला चकीत झाली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीने आपली फसवणूक करुन दुसरा विवाह केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. उत्तर प्रदेशातल्या हरदोईतलं हे प्रकरण आहे. सात वर्षांपूर्वी आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेने नोंदवली होती.

काय आहे हे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील मुरारनगर भागात आटमाऊ गाव आहे. या ठिकाणी राहणाऱ्या शीलूचं लग्न २८ एप्रिल २०१७ च्या दिवशी आटमाऊ गावातल्या जितेंद्र कुमार उर्फ बबलूशी झालं होतं. जितेंद्रने सासरच्या मंडळींकडून सोन्याची साखली आणि अंगठी मागितली होती. मात्र त्याची ही मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे त्याने शीलूला घरातून हाकलून दिलं. यानंतर या महिलेने हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर काही महिन्यांतच शीलूच्या वडिलांनी जितेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी जितेंद्र कुमारचा शोध घेतला. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी अखेर जितेंद्रचा शोध घेण्याचं प्रकरण बंद केलं.

इन्स्टाग्राममुळे काय समजलं?

शीलूला सात वर्षांनी बेपत्ता झालेला पती इन्स्टाग्राम रिलवर दिसेल असं वाटलंही नव्हतं. ती जेव्हा सहजच इन्स्टाग्राम बघत होती तेव्हा तिला जितेंद्र कुमार आणि दुसऱ्या एका महिलेचा व्हिडीओ दिसला. जितेंद्र लुधियाना येथील एका महिलेसह असून तो तिच्यासह रील बनवत होता हे शीलूला समजलं. यानंतर शीलने पोलीस ठाणं गाठलं आणि जितेंद्रने दुसरं लग्न केलं आहे आणि आपली फसवणूक केली आहे अशी तक्रार नोंदवली. शीलूने माध्यमांना सांगितलं की काही दिवसांपूर्वीच तिचं आणि तिच्या पतीचं म्हणजेच जितेंद्रचं बोलणं झालं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. तिचा आरोप आहे की हुंडा प्रकरणाच्या आरोपांतून वाचण्यासाठी जितेंद्र आणि तिच्या वडिलांनी हा सगळा कट रचला. पोलिसांनी म्हटलं आहे की शीलूने दिलेल्या तक्रारीनंतर आमचा शोध सुरु आहे. पोलीस मोबाइलच्या आधारे जितेंद्रचं लोकेशन तपासत आहेत. त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसरी बाजू कळू शकणार आहे. यानंतर आम्ही या प्रकरणात पुढची पावलं उचलू असंही पोलिसांनी सांगितलं आहे.