नवी दिल्ली :मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले असून यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने देशाची राजधानी दिल्लीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकिनाऱ्याच्या परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बुधवारी यमुनेच्या पाण्याच्या पातळीत २०७.५५ मीटर नोंदविण्यात आली. १९७८ मध्ये यमुनेची पाणीपातळी २०७.४९ मीटर नोंदविण्यात आली होती. मात्र हा विक्रम बुधवारी मोडीत निघाला.

नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. दिल्लीत गेल्या तीन दिवसांत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता पाणीपातळी २०३.१४ मीटर होती. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता २०५.३३ मीटरचे धोक्याचे चिन्ह ओलांडले. त्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने पूरग्रस्त भागांत राहाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. रस्ता आणि रेल्वे वाहतुकीसाठी जुना रेल्वे पूल बंद करण्यात आला.

दिल्लीचे पाणीपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, दिल्ली सरकार परिस्थतीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि नागरिकांना वाचविण्यासाठी शक्य ती पावली उचलली जात आहेत. यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास राजधानीच्या इतर भागात पुराचे पाणी शिरू नये यासाठी सखल भागात बंधारे बांधले जात आहेत, असे ते म्हणाले. पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे दिल्ली व जवळपासच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या पातळी वाढ झाली आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. जनजागृती, निर्वासन आणि बचाव कार्यासाठी ४५ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत आणि स्थलांतरित लोकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना मदत करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. भारद्वाज यांनी पूरस्थिती आणि केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा घेण्यासाठी मदत शिबिरांना भेट दिली आहे.

पूरप्रवण भागांत कलम १४४ लागू

यमुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने दिल्ली पोलिसांनी बुधवारी शहरातील पूरप्रवण भागांत भारतीय दंड विधानाचे कलम १४४ लागू करण्यात आले. या कलमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या कलमानुसार चार किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास प्रतिबंध करते. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक परिपत्रक काढून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आणि त्यांना सखल भागांतून जाण्यापासून सावध केले. यमुना नदीत पूरस्थिती कायम असल्याने नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून दूर राहावे आणि गरज भासल्यास १०७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे त्यात म्हटले आहे.

केजरीवाल यांची केंद्राकडे मदतीची मागणी

पूरस्थिती वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली. राजधानीतील पूर जगाला चांगला संदेश देणार नाही. शक्य असल्याच हरियाणातील हथनीकुंड बॅरेजचे पाणी मर्यादित वेगाने सोडले जावे, असे केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दिल्लीत काही आठवडय़ांत जी-२० शिखर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. देशाच्या राजधानीतील पुराची बातमी जगाला चांगला संदेश देणार नाही. या परिस्थितीतून दिल्लीतील लोकांना वाचवावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले.

कासोलमध्ये अडकलेल्या दोन हजार पर्यटकांना बाहेर काढण्यात यश

शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील कासोल भागात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या सुमारे २००० पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सिंह सुखू यांनी बुधवारी ही माहिती दिली. लाहौलमध्ये अडकलेली ३०० हून अधिक पर्यटक वाहने आपापल्या स्थळी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले. कुल्लू-मनाली रस्ता मंगळवारी संध्याकाळी खुला झाला आणि २,२०० वाहने या रस्त्यावर धावली. गेल्या दोन दिवसांपासून मनाली परिसरात मोबाइल सिग्नल नव्हता आणि पर्यटक त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब, हरियाणात मदतकार्य वेगाने

चंडिगड : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पंजाब व हरियाणातील अनेक भाग जलमय झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर बुधवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वाधिक नुकसान झालेल्या अंबाला जिल्ह्याला भेट देतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबमध्ये पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आणि फतेहगढ साहिब जिल्ह्यांमधून आतापर्यंत सुमारे १० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दोन राज्यांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमुळे मृतांची संख्या १५ आहे.