पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील एका कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अत्याचारापासून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. मुझफ्फराबाद येथील एका कुटुंबाला प्रशासनाने घराबाहेर हाकलून दिले असून त्यामुळे त्यांना थंडीत रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. आता या प्रकरणी कुटुंबप्रमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत आणि हस्तक्षेपाचं आवाहन केलं आहे. त्याला आणि पत्नीला आपल्या मुलांसोबत मोकळ्या जागेत राहायला भाग पाडले जात आहे असे म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मलिक वसीमने त्याला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, असे आवाहन केले आहे. मला मुझफ्फराबाद प्रशासनाकडून त्रास सहन करावा लागत आहे, असे वसीमने म्हटले आहे. “पोलीस आणि प्रशासनाने आमचे घर ताब्यात घेतले आहे. आम्हाला काही झाले तर त्याला मुझफ्फराबादचे आयुक्त आणि तहसील जबाबदार असतील,” असे वसीम मलिक म्हणाले. व्हिडिओमध्ये वसीम मलिकशिवाय त्याची पत्नी आणि मुलेही रस्त्यावर बसलेली दिसत आहेत. मुझफ्फराबादमधील सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, स्थानिक प्रशासनाने त्यांना घरातून हाकलून दिले आहे आणि एका मोठ्या व्यक्तीने त्याची जमीन ताब्यात घेतली आहे. पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीने त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. वसीम यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन भारताची आहे आणि तिची मालकी बिगर हिंदू आणि मुस्लिमांकडे आहे. 'पंतप्रधान मोदींना आवाहन, पाकिस्तानला धडा शिकवा' पोलिसांनी हजारो कुटुंबांची घरे ताब्यात घेतली आहेत आणि थंडीच्या रात्री लोकांना रस्त्यावर राहावे लागले आहे. पीओकेमध्ये मोठ्या लोकांनी घरे ताब्यात घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. वसीम मलिक म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला धडा शिकवण्याचे आवाहन करतो. ही तुमची मालमत्ता आहे. ही मालमत्ता बिगर मुस्लिम आणि शिखांची आहे. इथे या आणि लोकांना अत्याचारांपासून मुक्त करा.” पोलीस अधिकारी सबर नक्वी यांचे नाव घेत वसीम म्हणाला की, “आज या लोकांना आपल्याला घरातून हाकलून दिले आहे. या लोकांना कोणत्या कायद्याने आपल्याला घराबाहेर हाकलले आहे?” वसीम मलिकने दिली आत्महत्या करण्याची धमकी पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेकदा स्थानिक लोक प्रशासनाच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. पीओके हा भारताच्या जम्मू-काश्मीर प्रांताचा अविभाज्य भाग आहे, ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे. ऑक्टोबर १९४७ पासून हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि लोकांनी अत्याचाराविरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. हा भाग पाकिस्तानच्या मागास भागांपैकी एक आहे. वसीम मलिकने घर परत न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.