ऊन्हाच्या झळांची तमा न बाळगता पालघर मतदारसंघात ६३ टक्के मतदान

पालघर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चौथ्या टप्प्यात पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. या वेळी ऊन्हाच्या तीव्र झळांची तमा न बाळगता मतदार मोठय़ा उत्साहात सहभागी झाले. मे २०१८ मध्ये झालेल्या पालघर निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये दुपारी तीन वाजता ओलांडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५७ टक्के मतदान झाल्याने या मतदार संघातील मतदान ६५ टक्के होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

निवडणुकीसाठी सार्वजनिक तसेच जिल्ह्य़ातील अनेक उद्योगांनी कामगारांना मतदानासाठी सुटी आणि सवलती दिल्याने यापूर्वीच झालेल्या निवडणुकीत सकाळच्या प्रहरी मतदानसाठी लागणाऱ्या रांगा दिसून आल्या नाहीत. सकाळी नऊ  वाजेपर्यंत जेमतेम सात टक्के मतदान झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र नंतर मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क  बजावल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३५ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४७ टक्के मतदान झाले. वातावरणातील दमटपणा आणि सुमारे ३७ अंश तापमानाला न जुमानता मतदार मोठय़ा उत्साहात बाहेर पडल्याने या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

मे २०१८ मध्ये झालेल्या पालघर पोट निवडणूक ५३.२२ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी नालासोपारा येथे ३५ तर वसई येथे ४८.४७ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती.

यावेळी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्रात अनुक्रमे ४०आणि  ५० टक्के मतदान झाले.  उष्णतेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनेक मतदार केंद्र बाहेर मंडपाची व्यवस्था केल्याने मतदारांना सोयीचे झाले. तरीदेखील मतदानासाठी लागलेल्या रांगांमध्ये उभे राहिले असताना काही मतदार चक्कर येऊन पडल्याचे प्रकार घडले. यासाठी मतदारांना ‘ओआरएस’ पावडरचा पुडा पुरविण्यात आला होता.

आकडेवारी

’ डहाणू- ६६.२३

’ विक्रमगड – ६२.१५

’ पालघर- ५९.७६

’ बोईसर- ५९.००

’ नालासोपारा- ४८.५०

’ वसईजवळील वाघोली येथील मतदान केंद्रावर सकाळी दहाच्या सुमारास  इलेक्ट्रॉनिक मतयंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद पडले.

’ सर्व मतदारसंघात ३६८२ अपंग मतदारांची नोंद झाली.अपंगांसाठी विशेष रॅम्प व चाकांच्या खुर्चीची व्यवस्था करणे अपेक्षित होते.

’ सुटी जाहीर केल्यानंतरही लघु व मध्यम उद्योगांनी  कामगारांना मतदानासाठी वेळेत  सवलत देण्यात आली होती.