लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी ५४२ मतदारसंघाचे कौल समोर आले असून भाजपाप्रणित एनडीए ३४३ जागांवर आघाडीवर आहे. देशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत असून या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असे ट्विट मोदींनी केले आहे. पुन्हा एकदा भारताचा विजय, असेही त्यांनी म्हटले आहे.

गुरुवारी लोकसभेसाठी मतमोजणी झाली असून यात भाजपाने आघाडी घेतली आहे. भाजपा ३०० जागांवर आघाडीवर असून या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्व जण मिळून भारत घडवूया, पुन्हा एकदा भारताचा विजय झाला, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील ट्विटरवरुन विजयावर प्रतिक्रिया दिली. फिर एक बार मोदी सरकार, भारताचा आभारी आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. हा संपूर्ण भारताचा विजय असून भारताचे तरुण, गरीब, शेतकरी यांचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. विश्वास आणि विकासाचे प्रतीक म्हणजे मोदी सरकार असून भारताच्या जनतेला आम्ही नमन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.