लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील चौथा टप्पा २९ तारखेला म्हणजेच येत्या सोमवारी पार पडतो आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चा आहे ती मोदी भंडार या दुकानाची. धुळ्यातील पाच कंदिल भागात हे दुकान आहे. मोदी भंडार हे पूजा साहित्याचे दुकान आहे. या दुकानात लोक खास येऊन विचारतात की मोदी भंडार हे नाव तुम्ही दुकानाला का दिले? मोदी भंडार हे नाव देण्यामागे निवडणुकीचे काही खास कारण आहे का? हाच प्रश्न लोकसत्ता ऑनलाईननेही मोदी भंडारचे मालक रतीमोहन मोदी यांना विचारला. ते म्हटले मोदी भंडार या नावामुळे लोक प्रश्न विचारतात. मात्र मोदी हे आमचे आडनाव असल्यामुळे आम्ही या दुकानाला हे नाव दिले आहे. सध्या लोकसभा निवडणूक आहे देशात मोदी यावेत अशी अनेकांची इच्छा आहे त्यामुळे या दुकानाच्या नावाबाबत विचारले जाते असेही रतीमोहन मोदी यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा देशात मोदी सरकार यायला हवं का? हे विचारलं असता रतीमोहन मोदी म्हणतात, पुन्हा एकदा मोदी सरकार यायला हवं. मोदींना आणखी एक संधी द्यायला हवी. मोदींनी ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे त्याला तोड नाही. एवढंच काय तर फक्त पाकिस्तानच नाही तर चीनही आपल्याला वचकून आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय लोकहिताचे आहेत असं आपल्याला वाटत असल्याचंही रतीमोहन मोदी सांगतात. त्यांच्या दुकानात आलेले एक ग्राहक मधुकर पाटील म्हटले की आम्हालाही मोदी सरकार यावं अशीच इच्छा आहे. निवडणूक असल्याने या दुकानाच्या नावाकडे आम्ही आकर्षित होतो आणि इथून पूजा साहित्य घेऊन जातो. धुळ्यात सुभाष भामरे निवडून येतील असा विश्वास वाटतो कारण देशाच्या जनतेला मोदी सरकार हवं आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे. मोदी भंडार हे नाव वाचूनच मी दुकानात आले असं शालिनी साळगावकर यांनी सांगितलं. त्यांना धुळ्याबाबत विचारलं असता धुळ्यात सुभाष भामरे निवडून येतील आणि देशात मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील असंही त्या म्हटल्या.