निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात १०७ कलमाचा वापर केला जातो. मात्र, पश्चिम बंगालमध्ये असं होताना दिसत नाही, त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भुमिका कसे काय घेऊ शकते? असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये वोटबँकेच्या राजकारणसाठी हिंसाचार सुरु आहे. मात्र, तृणमुल काँग्रेसची उलटी मोजणी आता सुरु झाली आहे. हारणारी बाजी विजयामध्ये पलटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन हे निश्चित झालंय. हार स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही शाह यांनी केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने याप्रकरणी त्वरीत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करताना तृणमुल काँग्रेसच्या गुंडांना पकडल्याशिवाय येथे निष्पक्ष निवडणूक होणार नाही, असेही शाह यांनी म्हटले आहे. ममता दीदींनी दोन दिवसांपूर्वीच भाजपाला बदला घेण्याची धमकी दिली होती. मात्र, तरीही त्यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाकडून बंदी का घालण्यात आली नाही, असा सवालही यावेळी त्यांनी केला.

तसेच हिंसाचाराची चिखलफेक करुन आपण निवडणूक जिंकू असे तुम्हाला वाटत असेल तर जेवढा चिखल तुम्ही फेकाल तेवढे कमळ पुन्हा फुलेल, अशा शब्दांत शाह यांनी बंगालमध्ये भाजपा विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.