मी जन्मतः शिवसैनिक असून चौकीदार होण्याची गरज नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मंगळवारी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे आपलं रोखठोक मत मांडताना दिसणार आहेत.

विरोधी पक्षात गेल्यानंतर सगळ्यांनाचा पंतप्रधान व्हायचं आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. जेवढ्या माझ्याकडे जागा आल्या आहेत तेवढ्यातच शिवसेना ठेवावी आणि बाकीकडे न्यायची नाही का ? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. राहुल गांधी नेमकं काय करत आहेत हादेखील प्रश्न लोकांना पडला आहे अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

युतीनंतर आमच्यात एक गलथानपणा आला, तो आता राहणार नाही अशी कबुली यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. भारत काँग्रेसमुक्त झाल्यामुळे सगळे प्रश्न मिटतील असं तुम्हाला वाटतं का ? असं विचारलं असता नष्ट किंवा काँग्रेसमुक्त अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत असं त्यांनी सांगितलं. अयोध्येला जाण्यासंबंधी विचारलं असता राम मंदिराच्या कामाला गती मिळाली नाही तर पुन्हा अयोध्येला जाईन असं त्यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारला अजून पाच वर्ष दिली पाहिजेच असं मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. गेल्या पाच वर्षात कधीही मी सरकारला दगा दिला का ? असं विचारताना घोषणांच्या पिकाला कधी कोंब येणार आहे की नाही ? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी केली. मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक पण मत देणार नाहीत. एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण केली नाही तर लोकांमधील असंतोष वाढत जातो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आम्ही दगा देणार नाही, आम्हाला दगा देऊ नका हा शिवसेनेचा स्वभाव आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. आपण ठरवतो की हा आपल्यावर टीका करतोय उद्या याला ठोकायचं, तो विचार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा वडील किंवा मुलगा युतीतल्या पक्षात आलेला असतो असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला. मी कधीही शिवसेनेला लाचार होऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मोदी है ते मुमकीन है असं म्हणतात अशी विचारणा संजय राऊत यांनी केली असता उद्धव ठाकरे है तो मुमकीन भी है और नमकीन भी है असं त्यांनी म्हटलं.