– समीर जावळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला फसवलं आहे ते पुन्हा कधीही पंतप्रधान होणार नाहीत त्यांनी फक्त देशाला खोटी आश्वासनं दिली आणि विकास घडवतो, पंधरा लाख खात्यात जमा करतो असं सांगत देशाला फसवलं त्यामुळे ते कधीही निवडून येणार नाहीत असं परखड मत अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विष्णुपंत म्हस्के यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या आत्महत्या मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी केल्या असाही आरोप म्हस्के यांनी केला. ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोदींबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या सभांना गर्दी होते आहे मात्र तरीही ते पंतप्रधान होणार नाहीत असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठीचा तिसरा टप्पा मंगळवारी महाराष्ट्रात पार पडला. यावेळी अहमदनगरलाही मतदान होतं. याच वेळी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मोदी लाट आहे अशी चर्चा सध्या काही लोक करत आहेत. मात्र प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकांनंतर परिवर्तन झालेलं दिसेल यात काहीही शंका नाही असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे. महाआघाडीचं सरकार या देशात येईल. मोदी लाट या देशात नाही उलट नाराजीची तीव्र लाट मोदींच्या विरोधात आहे. सत्तेवर येण्याआधी ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना मोदींनी विविध आश्वासनं दिली होती. मात्र त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यांच्या भुलथापांना आता जनता बळी पडणार नाही आणि त्यामुळे मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं मत म्हस्के यांनी व्यक्त केलं.