भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने आपले हात वर केले आहेत. भाजपाने एक पत्रक प्रसिद्ध करुन साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. भारतीय जनता पार्टी त्यांना शहीदच मानते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले विधान हे त्यांचे व्यक्तीगत मत आहे असे भाजपाचे म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा यांना अनेक वर्ष तुरुंगात जो मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी हे विधान केले असावे असे भाजपाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा भोपाळमधील भाजपाच्या उमेदवार आहेत.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले