ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असणारे सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटच्या निवडणुकीत मला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची साथ हवी आहे असं भावनिक आवाहनही केलं. ‘माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवी आहे’, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निर्धार मेळाव्यात बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केली. शरद पवारदेखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं की, ‘शरद पवारांनीच मला राजकारणात आणलं. मी अनेक निवडणुका लढवल्या पण शरद पवारांनी कधीच माझी साथ सोडली नाही. शेवटच्या निवडणुकीतही मला शरद पवारांची साथ हवी आहे. मला त्यांच्या आशिर्वादाचाी गरज आहे’.

यावेली बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली. नरेंद्र मोदींनी देशाला कुठे नेऊन ठेवलं आहे हे न बोलललेच बरं असं त्यांनी म्हटलं. सुशीलकुमार शिंदे हे निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात. 2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.