तुमच्या काळात हजारो कोटींचा सिंचन घोटाळा केला… त्याची लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा केला, त्यामुळे मुख्यमंत्री पद घालवावं लागलं त्याची लाज कशी वाटत नाही… शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तर धरणात करंगळी वर केली, याची लाज वाटत कशी वाटत नाही…असे रोखठोक प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना दिलं आहे. ‘लाज कशी वाटत नाही’ हे विचारायलाच तुम्हालाच लाज कशी वाटत नाही असा प्रतिसवाल विनोद तावडे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केला.

लाज कशी वाटत नाही अशी निवडणूक प्रचाराची टॅगलाईन करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याला इतक निगरगट्टपणे “लाज कशी वाटत नाही” हे कसे विचारु शकता असा सवाल करताना तावडे म्हणाले की, ‘साडेचार-पाच वर्षात आमच्या सरकारने विकासाची काम केली, आपल्या देशाची सुरक्षा वाढली तसेच खऱ्या अर्थाने या राष्ट्राची आर्थिक प्रगती झाली, त्याचा अभिमान काँग्रेस आघाडीला वाटला पाहिजे. ते सोडून केवळ राजकारणासाठी इतक्या निगरगट्टपणे कुठला पक्ष कसा प्रचार करु शकतो याचे आश्चर्य वाटते’.

पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुदा गेल्या १० वर्षांत प्रथमच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेले आपल्या वाचनात आले, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मनापासून बोलले की, निवडणूकीपुरतं बोलले. निवडणूकीसाठी महाआघाडी म्हणून एकत्र आले आहेत, त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने बोलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे का.. हे खरंच एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याला सांगावे, असा टोलाही तावडे यांनी लगावला.

जर शरद पवार यांना खरंच असं वाटत असेल की, त्यांच्या घराण्याची काळजी करण्याचे काही कारण नाही. तर रोहित काय करतो, पार्थ काय करतो, दादांच वक्तव्य कसे असतं, याची सर्व माहिती शरद पवार यांना आहे. ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे आपल्या घरातील प्रश्न आपण सोडवाल असे सांगतानाच तावडे म्हणाले की, पण जसे नरेंद्र मोदी आपल्या विषयी अन्य चांगल्या गोष्टी बोलतात व राजकारणात ते आपल्याला खऱ्या अर्थाने ते मार्गदर्शक मानतात, त्यामुळे आपल्या कुटुंबाविषयी व्यक्त केलेली चिंता चांगल्या कारणासाठी आहे, असं त्यांनी सांगितलं.