पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निधडय़ा छातीचे कणखर नेतृत्व असून पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांना त्यांनी मारले, त्यामुळे ही निवडणूक गल्लीतली नसून दिल्लीतील आहे. आपल्याला मजबूत सरकार पाहिजे की मजबूर सरकार पाहिजे हे आता मतदारांनी ठरवायचे आहे असे आवाहन शिवसेना युवाशाखा प्रमुख  आदित्य ठाकरे यांनी कोपरगाव येथील भाजप सेनेच्या महायुतीच्या प्रचार सभेत केले.

व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहळता कोल्हे, आमदार नरेंद्र दराडे, बिपीन कोल्हे, शरद थोरात,शिवाजी ठाकरे, सचिन तांबे रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते,राजेंद्र झावरे आदी उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले देशात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याची कुणकुण लागली आहे त्यामुळे काँग्रेसची युती बिथरली आहे. राज्यात  काँग्रेस राष्ट्रवादीने विकासाऐवजी पाणी प्रश्नावरून प्रादेशिक वाद लावून ठेवले आहे. राज्यात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प युतीने पुन्हा सुरू केले असून कोपरगाव तालुक्याचा सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी  प्रयत्न करणार असून निळवंडे पाणी प्रश्न धसास लावू.

खासदार सदाशिव लोखंडे  यांनी सांगितले की, निळवंडे धरण परिक्षेत्रातील १८२ गावांच्या कालवे सिंचनासाठी केंद्राकडून पंतप्रधान मोदी व नितीन गडकरी यांनी २२३२ कोटी रुपये निधी दिला आहे त्यामुळे ही कामे  मार्गी लागतील. तसेच राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पश्चिमेकडील पाणी वळविण्याचे काम त्वरित केले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार कोल्हे यांनी  जरी भाजपची आमदार असले तरी सेनेच्या विविध मंत्र्यांनी कोपरगाव वतालुक्याला निधी मिळून देण्यासाठी मोठी मदत केली असे सांगितले.