लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत आता तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठीचा प्रचार सुरु आहे. कोल्हापूर येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार ही बाब दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना जेव्हा महाविकास आघाडीने तिकिट दिलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. “वर्षाताई माझं मत तुलाच” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुनच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“मुंबईत २६ जुलैचा पूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून उद्धव ठाकरे कुटुंबासह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले होते.” हा प्रसंग त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. तसंच बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील-मुख्यमंत्री
“बाळासाहेब म्हणाले होते शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ माझ्यावर आली तर दुकान बंद करेन. आज त्यांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार आहे. या देशाचं आणि राज्याचं हे दुर्दैव आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. हे पाऊल उचलल्याने बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील. ज्या गोष्टींचा खेद वाटला पाहिजे त्या अभिमानाने सांगत आहेत.” असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
हे पण वाचा- “पंतप्रधान मोदी विश्वनेते, कुणीही नाद करायचा नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
उद्धव ठाकरेंना हिंदू शब्द उच्चारण्याचीही लाज वाटू लागली आहे
“आता त्यांना (उद्धव ठाकरे) हिंदू हा शब्द उच्चारण्याचीही लाज वाटू लागली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे म्हणायला त्यांची जीभ कचरते. उबाठाची आता काँग्रेस झाली आहे. त्यामुळेच आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींसारखा कर्तृत्ववान नेता निवडायचा आहे. देशात उष्मा वाढला की विदेशात पळणारा नेता (राहुल गांधी) आपल्याला नको.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली.