महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपले अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. तर उर्वरित मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने मागच्या दोन-तीन महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या टप्प्यात हा प्रयत्न फसला. वंचितने 'एकला चलो'चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अकोल्यामधून उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने काल (दि. १ एप्रिल) रात्री उशीरा अकोला मतदारसंघासाठी डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर, कोल्हापूर मतदारसंघासह सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र आता त्यांच्याविरोधातच उमेदवार दिल्यामुळे प्रकाश आंबडेकर काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसकडून अकोल्यात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी; तिरंगी लढत होणार संजय राऊतांवर टीका करणारे आंबेडकर काय भूमिका घेणार? शिवसेना उबाठा गटाने अकोल्यात माझ्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी दर्शविली आहे, असा आरोप करून प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर जहाल टीका केली होती. "संजय किती खोटं बोलणार?", अशा आशयाचे ट्विट करून संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचे चित्र प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले होते. तसेच उबाठाकडून अकोल्यात उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सर्वात आधी शिवसेना उबाठा गटाशी आघाडी केली होती. शिवसेनेनेच वंचितला मविआमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मविआच्या बैठकांनाही वंचितच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येत होते. मात्र जागावाटपाच्या चर्चांवरून वंचित आणि मविआमध्ये दुरावा निर्माण होत गेला. संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या ट्विटनंतर शिवसेना आणि वंचितचे संबंध आणखी ताणले गेले. दरम्यान वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पत्र लिहिून काही जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली. काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा, मात्र अकोला लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा मागितलेला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर, कोल्हापूरसाठी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊनही काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या विरोधातच उमेदवार दिल्यामुळे वंचितसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अकोला लोकसभेसाठी भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे अकोल्यात आता तिरंगी लढत होईल. वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांनी यावर अद्याप भूमिका व्यक्त केलेली नाही. कोण आहेत डॉ. अभय पाटील? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेस समितीचे महासचिव असलेले डॉ. अभय पाटील हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ऑर्थोपेडीक सर्जन असलेले पाटील ३० वर्षांपासून अकोल्यात प्रॅक्टिस करत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या असल्याचे सांगितले जाते. अकोला आणि वाशिममध्ये त्यांनी मरठा क्रांती मोर्चाचे संयोजन केले होते.