राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत आणि बीकेयूचे प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत यांची गुरुवारी मुझफ्फरनगरमध्ये भेट झाली. या बैठकीमुळे उत्तर प्रदेशचे राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे. राऊत ही फक्त सुरुवात आहे आणि उत्तर प्रदेशात राजकारण बदलणार आहे, आमची लढाई भाजपच्या नोटेशी आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. पैशाच्या लोभात पडू नका, असे आम्हाला लोकांना सांगायचे आहे. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० ते १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असे राऊत यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही भाष्य केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राकेश टिकैत यांच्यासोबत फोनवरुन फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन चर्चा केली होती. या देशाचे राजकाराण शेतकऱ्याच्या समर्थनाशिवाय चालत नाही. या देशात सत्तेवर कोण बसणार हे शेतकरी ठरवतात. पण सत्तेवर बसलेले नंतर शेतकऱ्यांना विहिरीत ढकलतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे दोन वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्याला भेटण्यासाठी मी इथे आलो आहे,” असे संजय राऊत म्हणाले. “भाजपाचा जन्म हा शिवसेनेच्या नंतर झाला आहे. शिवसेनेला ५५ वर्षे झाली आहेत आणि तेव्हा पासून आम्ही राजकारणात आहोत. महाराष्ट्राबाहेर आम्ही जेव्हा निवडणुका लढण्यासाठी जातो तेव्हा कुणाची बी टीम म्हणून जात नाही. आम्ही कट्टर हिंदुत्त्वाच्या राजकारणापासून दूर गेल्याचे कोणी सांगितले. राहुल गांधीसुद्धा आमच्याच प्रभावामुळे हिंदू आणि हिंदुत्त्वाबद्दल बोलू लागले आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले. “आम्हाला निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचे समर्थन नाही तर आशिर्वाद पाहिजे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आमच्यासोबत आहे पण जर इथे त्यांना वाटत असेल तर आम्ही त्याबद्दल बोलू. उत्तर प्रदेशमध्ये बदल होणार आहे. ओपिनय पोलच्या गोष्टी खोट्या आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.