पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७) मुंबईत महायुतीच्या लोकसभेच्या सहा उमेदवारांसाठी संयुक्त सभा घेतली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ही सभा पार पडली. या सभेतून मोदी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवारांनाही टोला लगावला. नरेंद्र मोदी म्हणाले, “हे नकली शिवसेनावाले लोक केवळ सत्तेसाठी राम मंदिराला शिव्या घालणाऱ्या लोकांच्या बाजूला जाऊन बसले आहेत. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पार्टी करत बसणाऱ्या लोकांच्या बाजूला जाऊन बसले आहेत.”

नरेंद्र मोदी म्हणाले, “नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाले लोक दिवस-रात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी राहुल गांधींकडून एक वाक्य वदवून घ्यावं. ‘मी आयुष्यात कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार नाही’ एवढं एक वाक्य राहुल गांधींकडून वदवून घेऊन दाखवा.”

पंतप्रधान म्हणाले, “सध्या निवडणुका आहेत, त्यामुळे या लोकांनी (शिवसेना-राष्ट्रवादी) राहुल गांधींना शांत केलं आहे. राहुल गांधींच्या तोंडाला कुलूप लावलंय. मात्र त्यांनी राहुल गांधींकडून एक वाक्य वदवून घ्यावं, ‘मी आयुष्यभर सावरकरांच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही’ एवढं एक वाक्य या लोकांनी राहुल गांधींना बोलायला लावावं. ते त्यांना जमणार नाही. हे लोक असं करू शकत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की निवडणुकीनंतर राहुल गांधी पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देत बसणार आहेत. नकली शिवसेनावाले लोक महाराष्ट्राच्या मातीशी दगा करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले आहेत.”

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची आब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी म्हणाले, “घुसखोरांविरोधात लढणारी सेना अशी शिवसेनेची एकेकाळी ओळख होती. तीच नकली शिवसेना आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करत आहे. हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्यास या नकली शिवसेनेचा विरोध आहे. मी इतक्या वर्षांमध्ये एखाद्या पक्षाचं अशा प्रकारे हृदयपरिवर्तन झालेलं कधी पाहिलं नाही. नकली शिवसेना केवळ व्होट बँकेला खूश करण्यासाठी, मतांसाठी काही लोकांचं तुष्टीकण करण्यासाठी ज्या लोकांनी मुंबईला धोका दिला, ज्या कसाबने मुंबईकरांना मारलं, त्याच कसाबला क्लीनचिट देणाऱ्या लोकांच्या बाजूला जाऊन बसली आहे. या जगात आता पाकिस्तानचं कोणीही काहीही ऐकत नाही. मात्र इंडिया आघाडीवाले लोक त्या पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. पाकिस्तानची बाजू घेताना हेच लोक आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर, आपल्या वायूदलाने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त करतात. आपल्याच सैन्याला खोटं ठरवतात आणि नकली शिवसेना त्याच लोकांबरोबर जाऊन बसली आहे.