माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पंकजा मुंडे यांना भाजपाने बीडमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. दरम्यान, आज (गुरुवार, १८ एप्रिल) पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या, ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान द्या. मी लोकसभेवर गेल्यावर आपल्या मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू. परंतु, जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा. कारण ही पाच वर्षे जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, यंदाची निवडणूक ही एखाद्या महायुद्धापेक्षा मोठी आहे. हे महायुद्ध असल्यामुळेच मला या युद्धात उतरवलं आहे. साधी निवडणूक असती तर मला लोकसभेचं तिकीट कशाला दिलं असतं. हे महायुद्ध असल्यामुळेच आमच्या पक्षाने रथी-महारथींना कामाला लावलं आहे. लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठीच मला माझ्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीसाठी मी कुठेही उमेदवारी मागायला गेले नाही. मी कुठलंही पत्र घेऊन कोणत्याही नेत्याच्या घरी गेले नाही. मी मतदारसंघातला माझा कुठलाही अहवाल तयार करून फिरले नाही. ही उमेदवारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत ठरवली आहे. मला दिल्लीला जाण्याची हौस नाही. परंतु, पक्षाला असा उमेदवार हवा आहे जो जनतेला दिलेला शब्द पाळेल. माझी इच्छा होती की यावेळीदेखील पक्षाने प्रीतम मुंडे यांनाच लोकसभेचं तिकीट द्यावं. कारण गेली १० वर्षे त्यांनी या मतदारसंघात खूप कष्ट केले आहेत. त्यांनी राजकारण केलं नाही, केवळ कष्ट आणि काम केलं. परंतु, पक्षाने यावेळी उमेदवारी देताना माझी निवड केली. हे ही वाचा >> रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाच्या नारायण राणेंना उमेदवारी; उदय सामंत म्हणाले, “आम्ही राजकारणातून…” माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आज या मंचावरून सर्वांना वचन देते की, निवडून आल्यावर माझ्याकडे कोणी कामासाठी आलं तर मी त्याला त्याचं आडनाव विचारणार नाही. मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहीन. यावेळी नीट विचार करून मतदान करा. कारण अशी संधी जिल्ह्याला परत मिळणार नाही.