मुंबईत २० मे रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत प्रचारसभेला वेग आला आहे. स्टार प्रचारक ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. अशातच, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक इब्राहिम मूसाही सामील झाला होता, असा दावा भाजपा आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर त्यासंदर्भातील व्हीडिओही पोस्ट केलाय. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी बुधवारी सायंकाळी अंधेरी पश्चिम येथील निवडणूक प्रचारात मूसाने हजेरी लावल्याचा दावा करत अमोल कीर्तिकर आणि काँग्रेसवर टीका केली. "१९९३ च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवाद्यांचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत असून ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगची लढा आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे", असं अमित साटम यांनी एक्सवर म्हटलंय. कोण आहे इब्राहिम मूसा? बाबा चौहान या नावाने ओळखला जाणारा मूसा हा १९३३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी आहे. साखळी बॉम्बस्फोटापूर्वी अभिनेता संजय दत्तच्या घरी शस्त्रे नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. हेही वाचा >> “…तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहलं पाहिजे मेरा बाप महागद्दार”, शिंदे गटातील शिवसेना नेत्याचा हल्लाबोल उत्तर पश्चिम मतदारसंघात सेना विरुद्ध सेना मुंबई उत्तर पश्चिम जागेसाठी शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना यांच्यात लढत आहे. महायुतीने उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे वायकर आणि ठाकरे गटाचे कीर्तिकर यांच्यात थेट लढत आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या भागांचा समावेश होतो. रविंद्र वायकर काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात गेले आहेत. शिंदे गटात जाताच त्यांना लोकसभेची तिकिट मिळाली. ते मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे चारवेळा अध्यक्ष आणि जोगेश्वरीतून शिवसेनेचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २० मे रोजी निवडणूक होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होतील.