गेल्या महिन्याभरात लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशभरात भाजपासोबतच मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठीही प्रचारसभा घेतला. प्रज्वल रेवण्णासाठी झालेल्या अशाच एका प्रचारसभेवरून भाजपा अडचणीत सापडली होती. त्याचबरोबर एका प्रचारसभेत खुद्द नरेंद्र मोदींनी मुस्लिमांबाबत केलेल्या एका विधानामुळे विरोधकांनी भाजपाविरोधात मोहीम उघडली होती. त्या विधानांवर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधानांची नेमकी कोणती विधानं वादात? काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बन्सवाडा भागात प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करताना मुस्लिमांचाही उल्लेख केला. "आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का?" असा प्रश्न मोदींनी उपस्थितांना विचारला होता. “मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? “काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असंही ते म्हणाले होते. 'त्या' विधानावर पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण दरम्यान, या विधानांबाबत विचारणा केली असता पंतप्रधान मोदींनी आपण अल्पसंख्यकांविरोधात विधान केलंच नसल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राजकीय मुद्द्यांवर उत्तर दिलं. यावेळी त्यांनी मुस्लिम समुदायाविषयी केलेल्या विधानांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. "मी अल्पसंख्यकांविरोधात एक शब्दही बोललेलो नाही. मी काँग्रेसच्या व्होटबँकेच्या राजकारणावर बोलत आहे. काँग्रेस संविधानाविरोधात काम करतंय. त्यावर मी बोलतोय. भारताच्या संविधानाने, संविधान निर्मात्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित नेहरूंनी धर्माधारित आरक्षण होणार नाही हे संविधान सभेत म्हटलं आहे. आता तुम्ही त्याच्या विरोधात जात आहात. हे सगळ्यांसमोर आणणं माझी जबाबदारी आहे. त्या वेळी संविधानसभेत माझा पक्ष नव्हताच. देशातील विद्वान लोक होते. त्यांनीच हा निर्णय घेतला होता", असं मोदी म्हणाले आहेत. "भाजपा कधीच अल्पसंख्यकांविरोधात नव्हती. पण ते लोक तुष्टीकरणाच्या मार्गावर चालतात, मी संतुष्टीकरणाच्या मार्गावर चालतो. आम्ही सर्वपंथ समभावाच्या तत्वावर विश्वास ठेवतो. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालू इच्छित आहोत. आम्ही कुणालाही विशेष नागरिक मानायला तयार नाही", असंही मोदींनी यावेळी सांगितलं.