– डॉ. भरेश देढिया 
जगभर कोरोना विषाणूमुळे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे प्रचंड भीतीचे सावट निर्माण झाले आहे. या संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवणे, सामाजिक दुरावा पाळणे आणि एखादी व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे की नाही हे ठरवण्यासाठी झटपट चाचणी करून घेणे. भारत सध्या आपण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत आहे की या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे, हे येत्या काही आठवड्यांमध्ये ठरणार आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना संशयित रुग्णांपासून वेगळे ठेवण्यासाठी झटपट व प्रभावी चाचणी हा एकच उपाय आहे.

सध्या तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात – व्यक्तीच्या नाकपुड्या किंवा घसा यातून स्वॅबने सॅम्पल घेणे, रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट व रक्त चाचणी. पहिल्या चाचणीमध्ये स्वॅब नमुने घेतले जातात आणि व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडिअम (व्हीटीएम) कंटेनरमधून हे नमुने चाचणी केंद्राकडे पाठवले जातात. हे कंटेनर विषाणूंना कैद करून ठेवते.

अलीकडच्या काळात, केंद्र सरकार व आयसीएमआर यांनी काही खासगी रुग्णालयांना व लॅबना नमुने गोळा करण्याची व त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, खासगी रुग्णालयांची भूमिका सध्या नमुने गोळा करण्यापुरती आणि हे नमुने जवळच्या चाचणी केंद्राकडे पाठवण्यापुरती मर्यादित आहे. तसेच, खासगी डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीजना होम-टेस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये, रुग्णांना घरबसल्या चाचणी करून घेता येते. नमुने घेणारी व्यक्ती हे नमुने अतिशय काळजीपूर्वकपणे व्हीटीएम कंटेनरमधून जवळच्या चाचणी केंद्राकडे पाठवते. रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह आहे की नाही, हे कळण्यासाठी या चाचणीला 48 तासांपर्यंतचा अवधी लागतो व या चाचणीसाठी 4,500 रुपये खर्च येतो. परंतु, सध्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच ही चाचणी होम-टेस्टिंग पद्धतीने केली जाते.

दुसरा पर्याय असणारी, रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्ट ही फिंगरप्रिक ग्लुकोज टेस्टिंगसारखी असते. या चाचणीमध्ये, फिंगरप्रिक टेस्ट करून एक थेंब रक्त घेतले जाते, हे रक्त टेस्टिंग डिव्हाइसवर ठेवून चाचणी केली जाते व याचा निर्णय समजण्यासाठी 30 मिनिटांचा अवधी लागतो. तूर्तास, ही सुविधा भारतामध्ये उपलब्ध नाही. ही सुविधा लवकरच भारतामध्ये उपलब्ध होईल, अशी आशा आहे. तिसरा पर्याय म्हणजे, सर्वसाधारण रक्त चाचणी. यामध्ये, रक्ताचे नमुने घेतले जातात आणि चाचणी केंद्रांमध्ये या नमुन्यांची चाचणी केली जाते. यातून विषाणूसाठी अँटिबडीजची तपासणी केली जाते. ही चाचणीही सध्या भारतामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यासाठीचा खर्च अद्याप माहीत नाही.

करोनाची चाचणी करत असताना, विषाणू विष्ठेपर्यंत पोहोचला आहे की, हे तपासण्यासाठी शौचाचे नमुनेही घेतले जातात. परंतु, यावरही सध्या अभ्यास केला जात आहे आणि विषाणूचा संसर्ग झाल्याची खातरजमा करण्यासाठी शौचाचे नमुने पाठवायचे का, हे ठरवण्यासाठी थोडा कालावधी गरजेचा आहे.

(लेखक डिपार्टमेंट ऑफ क्रिटिकल केअरचे प्रमुख, हिंदूजा हॉस्पिटल, खार आहेत)