Kutch pre-Harappan evidence: इतिहासाच्या खोल गर्तेतून कधी कोणतं रहस्य समोर येईल हे काहीच सांगता येत नाही. असंच एक रहस्य समोर आलं आहे, ते गुजरातच्या कच्छमध्ये. संशोधकांना कच्छमध्ये पुरातत्त्वीय सर्वेक्षण करत असताना हडप्पासंस्कृतीच्या आधी अस्तित्त्वात असलेल्या आदिमानवाच्या निवासस्थानाचा शोध लागला आहे. आयआयटी गांधीनगर (IITGN) येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून कच्छच्या सांस्कृतिक उत्क्रांतीविषयी अनेक नवे पैलू समोर आले आहेत.
आयआयटी गांधीनगर (IITGN) येथील संशोधकांनी आयआयटी कानपूर (IITK), इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सेलेरेटर सेंटर (IUAC) दिल्ली आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) अहमदाबाद या संस्थांमधील तज्ज्ञांबरोबर मिळून केलेल्या संशोधनातून कच्छमधील मानवी वस्तीचे पुरातत्त्वीय पुरावे समोर आले आहेत. या पुराव्यांमुळे या भागात हडप्पा संस्कृतीच्या आगमनापूर्वी किमान ५,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व होते, हे सिद्ध झाले आहे.
हडप्पापूर्व सापडलेला मानवी समुदाय नक्की कसा होता?
- हडप्पापूर्व सापडलेला मानवी समुदाय हा कांदळवनाने व्यापलेल्या भागात वास्तव्यास होता.
- त्यांनी शंखप्रजातींचा म्हणजेच ऑइस्टर्ससारख्या बायव्हाल्व्ह्ज आणि गॅस्ट्रोपॉड्सचा उपयोग अन्नासाठी केला.
- हा समुदाय या शंखप्रजातींना वाढीस पोषक असलेल्या नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेत होता.
- यापूर्वी ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात कच्छ येथे शंखाचे साठे असल्याची नोंद केली होती.
- परंतु, त्याकडे shell midden स्थळ म्हणून पाहिले गेले नव्हते. Shell midden म्हणजे त्या ठिकाणावर माणसाने खाल्लेल्या शंखांचे ढीग साठवलेले असतात, असे आयआयटी गांधीनगरमधील प्रा. व्ही. एन. प्रभाकर यांनी सांगितले. प्रा. व्ही. एन. प्रभाकर हे आयआयटी गांधीनगरमधील पृथ्वी विज्ञान (Earth Science) विभागातील पुरातत्त्व विज्ञान केंद्रात सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आहेत.
- “आमचे संशोधन या स्थळाची ओळख पटवून देणारे तसेच या स्थळाचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करणारे आणि कालसुसंगत संदर्भ मांडणारे असे पहिलेच संशोधन आहे,” असे प्रा. प्रभाकर सांगतात.
- कच्छमध्ये अशा प्रकारची स्थळं पहिल्यांदाच नोंदवली गेली आहेत. पाकिस्तानमधील लास बेला व मकरान किनारपट्टीचा भाग तसेच ओमान द्वीपकल्पातील पुरातत्त्वीय स्थळांशी या स्थळांचे साम्य आढळून आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हे समजते की, या विस्तीर्ण किनारपट्टीवरील आद्य समाजाने अन्न गोळा करणे आणि जगण्यासाठी एकसारख्या पद्धती विकसित केल्या असाव्यात.
- “खादिर आणि आसपासच्या बेटांवरून गोळा केलेल्या शंखांच्या नमुन्यांचे विश्लेषण PRL अहमदाबाद येथे प्रा. रवी भूषण आणि जे. एस. रे यांच्या सहकार्याने, तसेच IUAC दिल्ली येथे डॉ. पंकज कुमार यांच्या मदतीने करण्यात आले,” असे प्रा. प्रभाकर यांनी नमूद केले.
कालनिश्चिती कशी करण्यात येते?
- या स्थळांचे वय निश्चित करण्यासाठी संशोधकांनी अॅक्सेलेरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (AMS) ही अचूक पद्धत वापरली. या पद्धतीद्वारे शंखांच्या अवशेषांमधील रेडिओअॅक्टिव्ह कार्बन-१४ (C-14) समस्थानकाचे प्रमाण मोजले जाते.
- C-14 हे सर्व सजीव जीवांद्वारे जिवंत असताना शोषले जाते. परंतु, मृत्यूनंतर त्याचे हळूहळू विघटन होऊ लागते आणि प्रत्येक ५,७३० वर्षांनी त्याचे अर्धे प्रमाण शिल्लक राहते. शंखांमध्ये उरलेल्या C-14 चे प्रमाण मोजून त्या जीवाचा मृत्यू किती वर्षांपूर्वी झाला हे वैज्ञानिक निश्चित करू शकतात.
- मात्र, कालांतराने वातावरणातील C-14 च्या पातळ्यांमध्ये बदल होत गेल्यामुळे या निकालांचे अचूक अंशांकन (calibration) करण्यासाठी वृक्षवलय (tree ring) डेटाचा वापर करण्यात आला.
- प्रत्येक वृक्ष दरवर्षी एक नवे वलय तयार करतो आणि या वृक्षवलयांद्वारे हजारो वर्षांपूर्वीचे कालखंडही अचूकपणे जुळवता येतात. त्यामुळे वातावरणातील C-14 च्या प्रमाणाचा अचूक संदर्भ कालपट (reference timeline) वैज्ञानिक तयार करू शकतात.
- संशोधक पथकाला तिथे विविध प्रकारची दगडी हत्यारे सापडली आहेत. या हत्यारांच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेले मूळ दगडी तुकडे (used cores) देखील आढळले आहेत.
- “या हत्यारांचे व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे अस्तित्त्व सूचित करते की, या समाजाने दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले होते,” असे या संशोधनातील सह-लेखिका व आयआयटी गांधीनगरमधील पोस्टडॉक्टरल संशोधिका डॉ. शिखा राय यांनी सांगितले. यासाठी लागणारा कच्चा माल खादिर बेटावरून मिळाल्याची शक्यता असून, हेच बेट पुढे सिंधूनगरी धोलवीरासाठी प्रसिद्ध झाले.
या संशोधनातून काय साध्य होते?
हे संशोधन कच्छमधील नागरी संस्कृतीचा विकास सिंध प्रांताच्या प्रभावाखालीच झाला या प्रचलित मताला आव्हान देते.
“कुठल्यातरी अचानक आलेल्या बाह्य प्रभावाऐवजी, येथील अवशेष इथल्या समाजांनी स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत कशा प्रकारे प्रगती केली हे दर्शवून देतात, असे प्रा. प्रभाकर म्हणाले.
“स्थानिक भूगोल, पाण्याचे स्रोत या साऱ्याचे सखोल ज्ञान या प्रागैतिहासिक समाजांनी आत्मसात केले होते आणि हेच ज्ञान सिंधू संस्कृतीच्या लोकांना पुढे वसाहतींचे नियोजन आणि लांबच्या पल्ल्याच्या व्यापारासाठी उपयुक्त ठरले असावे.”
- संशोधकांच्या मते, हे शंखमधिन (shell middens) आणि विखुरलेले शंखांचे अवशेष भविष्यात पुरा-हवामान अभ्यासासाठी (palaeoclimate studies) अत्यंत महत्त्वाचे ठरतील. हवामानातील बदल हा हजारो वर्षांच्या कालखंडात हळूहळू घडत जातो आणि त्याचे थेट निरीक्षण अल्पकालीन दृष्टीकोनातून शक्य नसते. मात्र, नैसर्गिक सामग्री ..जसे की, शंख या बदलांचे संकेत साठवून ठेवतात आणि त्यामुळे प्राचीन हवामान पुन्हा उलगडणे शक्य होते.
- आयआयटी गांधीनगरमधील मागील संशोधनामध्ये खादिर बेटाच्या गेल्या ११,५०० वर्षांतील पुरा-हवामानाचा नकाशा आधीच तयार करण्यात आला आहे.
- आता नव्याने सापडलेल्या या शंखमधिनांचे अधिक सखोल विश्लेषण केले असता, त्यातून आदिमानव ज्या हवामानात राहत होता, त्या वातावरणाविषयी महत्त्वपूर्ण नवे दृष्टिकोन मिळू शकतील, असे डॉ. शिखा राय स्पष्ट करतात. त्या पुढे म्हणतात, “आपल्या परिसंस्थेच्या मर्यादा ओळखून त्यानुसार जीवन जगण्याची त्यांची क्षमता आजच्या जागतिक हवामान बदलाच्या संदर्भात आपण सर्वांनी शिकण्यासारखी आहे.”
- या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष २०२५ मध्ये साउथ एशियन आर्किऑलॉजीवरील १७ व्या वार्षिक कार्यशाळेत (हार्टविक कॉलेज आणि शिकागो विद्यापीठ), इंडो-इराण सीमा क्षेत्रातील पुरातत्त्व विषयक परिसंवाद मालिकेत (सॉर्बोन विद्यापीठ, पॅरिस) आणि भारतीय प्रागैतिहासिक व चतुर्थकालीय अभ्यास संस्था (ISPQS), रायपूर यांच्या ५० व्या वार्षिक परिषदेत सादर करण्यात आले आहेत. या संशोधन पथकात आयआयटी गांधीनगरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्रा. विक्रांत जैन, आयआयटी कानपूरचे प्रा. जावेद मलिक आणि डेबज्योती पॉल, IUAC दिल्लीचे डॉ. पंकज कुमार, आणि एल. डी. कॉलेज, अहमदाबादचे महेंद्रसिंह गढवी यांचा समावेश आहे.