उत्तर भारतातील अनेक भागांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे पाणी तुंबणे, भूस्खलन होणे आणि रस्ते वाहून जाण्यासारख्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे शहरांमधील उच्चभ्रू परिसरांतील अनेक भागात पाणी शिरले आहे, ज्यामुळे तिथे राहणाऱ्या रहिवाशांची मालमत्ता, कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाणी ओसरल्यानंतर किती नुकसान झाले हे समजत असले तरी कार मालकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे, कारण वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळेच योग्य इन्शुरन्स कव्हरेज असल्यासच तुम्ही गाडीचं झालेलं नुकसान भरून काढू शकता.

पुरामुळे कारचे नुकसान कसे होते?

पुराचं पाणी वाहनांमध्ये शिरल्यानंतर गाड्यांमध्ये गंभीर समस्या उद्भवतात. जसे की इंजिनमध्ये बिघाड, इलेक्ट्रॉनिक सिस्टीमला नुकसान, गंज पकडणे आणि दुर्गंधी सुटणे असे प्रकारे घडतात. गाडीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे गीअरबॉक्सही खराब होऊ शकतो. जेव्हा पार्क केलेल्या वाहनात पाणी शिरते, तेव्हा ते कारच्या आतील भागाला देखील नुकसान पोहोचवू शकते. यापैकी काही समस्या ताबडतोब दिसतात, परंतु काही कालांतराने उद्भवू शकतात.

हेही वाचाः विश्लेषण : बनावट संकेतस्थळांचा धोका कसा वाढतोय?

सर्व कार विमा पॉलिसी पूर आणि संबंधित नुकसान कव्हर करतात का?

“एक सर्वसमावेशक वाहन पॉलिसी आग, पूर आणि चोरीमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या अपघातांना कव्हर देते,” असंही बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स मुख्य तांत्रिक अधिकारी टी. ए. रामलिंगम सांगतात. सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी पुरामुळे झालेल्या सर्व नुकसानासाठी कव्हर प्रदान करते, कारच्या वयाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाते. तसेच सर्व प्लास्टिक आणि रबर भागांसाठी ५० टक्के भरपाईच मिळते, याचा अर्थ एकूण दुरुस्तीच्या खर्चापैकी केवळ अर्धी रक्कम दिली जाते आणि उर्वरित रक्कम पॉलिसीधारकाला द्यावी लागते. एक स्वतंत्र सर्वसमावेशक कार विमा पॉलिसीसुद्धा पुरामुळे होणार्‍या सर्व नुकसानांपासून संरक्षण देऊ शकत नाही.

हेही वाचाः विश्लेषण : हवामान बदलामुळे महासागरांचा रंगपालट कसा होतो?

विमा कंपनी पुराच्या नुकसानाशी संबंधित दावे नाकारू शकते का?

मूलभूत सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी पूर संबंधित सर्व नुकसानांसाठी कव्हरेज प्रदान करते, तरीही चालकाच्या हेतुपुरस्सर कारवाईमुळे कारचे नुकसान झाल्यास विमा कंपन्या भरपाई देण्यास नकार देऊ शकतात. “जर तुमची कार तळघरात पार्किंगमध्ये किंवा सोसायटीच्या आवारात उभी असेल आणि ती पाण्यात बुडाली असल्यास तुम्ही थेट विमा कंपनीला तक्रार करून सर्व्हिस सेंटर प्रतिनिधी किंवा संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना गॅरेजमध्ये नेले तर कोणतीही अडचण येणार नाही. परंतु जर तुम्ही तुमची कार बुडल्यानंतर सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे इंजिन हायड्रोस्टॅटिक लॉकमध्ये जाईल. अशा परिस्थितीत विमा कंपनी इंजिनच्या बिघाडाची भरपाई करणार नाही, कारण हे जाणूनबुजून केलेल्या कृतीमुळे झालेले नुकसान असल्याचं ती समजते,” असंही Policybazaar.com चे नितीन कुमार म्हणतात.

जेव्हा कारचे इंजिन पाण्याच्या संपर्कात येते, तेव्हा हायड्रोस्टॅटिक लॉक होते. चालत्या इंजिनमध्ये पाणी शिरल्यावर इंजिन खराब होते. जर इंजिन चालू नसेल आणि पाणी आत गेले तर कोणतेही नुकसान होऊ शकत नाही, परंतु इंजिन सुरू करण्यापूर्वी गॅरेज मॅकेनिकची मदत घेणे फायद्याचे ठरते.

एखाद्याने कोणत्या प्रकारच्या कार विमा संरक्षणाची निवड करावी?

बदलती हवामान पद्धत, अनियोजित विकास आणि अपुऱ्या ड्रेनेज सिस्टीममुळे अनेक शहरे अतिवृष्टी आणि परिणामी पुरासाठी तयार नाहीत. कार विमा संरक्षण खरेदी करताना एखाद्याने मुसळधार पावसाच्या या वाढत्या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्वसमावेशक कार विमा पॉलिसीसह एखाद्याने अॅड ऑन कव्हर म्हणजेच शून्य घसारा आणि इंजिन संरक्षण कव्हर घेतले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना सल्ला देतो की, त्यांनी पाणी साचलेल्या भागात गाडी अडकल्यावर तिचे इंजिन सुरू करू नये. ज्या क्षणी तुम्ही गाडीचे इंजिन सुरू करता आणि त्यात पाणी जाते, ते ब्लॉक होऊन खराब होते,” असंही बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे रामलिंगम म्हणतात. एखादी व्यक्ती उपभोग्य वस्तूंच्या कव्हरची देखील विम्यात निवड करू शकते, जे इंजिन तेल आणि त्याचे पार्ट बदलण्यासाठी लागणाऱ्या खर्चापासून संरक्षण पुरवते.