– निमा पाटील

कोलंबियाच्या घनदाट जंगलांमधून शुक्रवारी ९ जूनच्या रात्री सैन्याच्या वॉकीटॉकीवर एक संदेश ऐकू आला. या संदेशाची संपूर्ण देश वाट पाहत होता खरा, पण तो संदेश ऐकायला मिळेल अशी आशाही अनेकांना उरली नव्हती. वॉकीटॉकीवरून सैन्याने सांकेतिक भाषेत पाठवलेल्या संदेशावरून लोकांना समजले की विमान अपघातानंतर गेले ४० दिवस बेपत्ता असलेली ४ मुले सापडली होती… जिवंत आणि सुरक्षित. या संपूर्ण घटनाक्रमाने अनेक प्रश्न उपस्थित केले तर काही प्रश्नांची उत्तरेही दिली.

Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

घटना काय घडली?

ही चार मुले आपल्या आईबरोबर लहानशा विमानातून प्रवास करत होती. विमानात अन्य दोन प्रौढ व्यक्तीही होत्या. ॲमेझॉनच्या जंगलामध्ये त्या विमानाला अपघात झाला. त्या अपघातामध्ये मुलांची आई मरण पावली, तर मुले बेपत्ता झाली. अपघातात आईबरोबरच अन्य दोन व्यक्तींचाही मृत्यू झाला. ही चारही मुले कोलंबियाच्या हुईतोतो या आदिवासी जमातीची आहेत.

मुले जिवंत असल्याची शंका का वाटली?

अपघातस्थळी मुलांच्या आईचा आणि अन्य दोघांचे मृतदेह सापडले. मुलांचाही मृत्यू झाला असेल असे मदत आणि बचाव पथकांना सुरुवातीला वाटले. मात्र, मुलांचे मृतदेह सापडले नाही. त्याशिवाय जंगलामध्ये मुलांच्या पावलांचे ठसे, अर्धवट खाल्लेली जंगली फळे आणि अन्य काही धागेदोरे सापडले. त्यामुळे मुले कदाचित अपघातातून वाचली असतील आणि मदतीचा शोध घेण्यासाठी अपघाताच्या ठिकाणापासून दूर गेली असावीत अशी आशा बळावली.

प्रत्यक्षात काय झाले होते?

अपघातानंतर १३ वर्षे, ९ वर्षे, चार वर्षे आणि एक वर्ष वयाची ही मुले घनदाट जंगलामध्ये अडकून पडली. जंगलाच्या या भागामध्ये साप, जग्वार अन्य वन्य प्राणी आणि डासांचा भरपूर वावर होता. या काळात मुलांनी बऱ्याच संकटांचा सामना केला, त्यातून वाचणे भल्याभल्यांना शक्य झाले नसते. त्यामुळेच असेल कदाचित, कोलंबियाच्या अध्यक्षांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘या मुलांचे जिवंत असणे हे इतिहासात कायमचे नोंदवले जाईल असे उदाहरण आहे.’

मुलांच्या कुटुंबीयांनी काय माहिती दिली?

या मुलांचे आजोबा फिडेंशियो वॅलेंशिया यांनी पत्रकारांना सांगितले की, चौघांपैकी दोन मोठी मुले लेस्ली आणि सोलेनी यांना जंगलात जिवंत राहण्याचे नियम अगदी व्यवस्थित माहित होते. हुईतोतो जमातीच्या सदस्यांना अगदी लहान वयापासूनच शिकार करणे, मासे पकडणे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जमवणे शिकवले जाते. तर या मुलांची काकू दमारिस मुकुतई यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील मुले मोठी होत असताना ते कुटुंबातील इतर लोकांबरोबर जिवंत राहण्याचा खेळ खेळतात. त्यांनीही लहानपणी हे खेळ खेळले होते, त्यावेळी ते लहान लहान तंबू तयार करत असत. स्वाभाविकच कुटुंबातील मुलांना हे सर्व शिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते.

जंगलामध्ये मुले कशी राहिली?

जंगलात अनेक विषारी फळे असतात, त्यापैकी कोणती फळे खायची नाहीत हे सर्वात मोठ्या १३ वर्षांच्या लेस्लीला माहीत होते. त्याबरोबरच तो लहान मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळू शकत होता. विमान अपघातानंतर लेस्लीने केसांच्या रिबिनींनी झाडांच्या फांद्या बांधून राहण्यासाठी तात्पुरता निवारा बांधला. अपघातग्रस्त सेसना २०६ विमानाच्या अवशेषांजवळच लेस्लीने एक प्रकारचे पीठही शोधून काढले. हे पीठ संपेपर्यंत मुलांनी त्याच्या आधारेच दिवस काढले. मुलांच्या शोधमोहिमेत सहभागी झालेले हुईतोतो जमातीचे सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीठ संपल्यानंतर मुले जंगली झाडांच्या बिया खात होते. त्याशिवाय बचाव पथक हेलिकॉप्टरमधून खाद्यपदार्थांची पाकिटे टाकत होते. त्याचाही मुलांना उपयोग झाला. विमान अपघात झाला तेव्हा जंगली झाडांना फळे येण्याचा हंगाम होता. तीच फळे मुलांच्या उदरनिर्वाहाचे साधन झाली.

जंगालमध्ये मुलांवर कोणती संकटे आली?

घनदाट जंगलामध्ये मुलांना स्वतःचा जीव वाचवताना अनेक संकटे आली. ही मुले जंगलाच्या अतिशय घनदाट आणि अंधाऱ्या भागात होती, त्या भागात सर्वात मोठी झाडे आढळतात. काही झाडांची पाने वापरून पाण्यावरचा कचरा दूर करून पाणी पिणे शक्य होते. मात्र जंगलात अनेक विषारी पानांची झाडेही आहेत. जंगलाच्या या भागामध्ये मानवी संचार फारसा नाही. या भागामध्ये लहान लहान वस्त्या जरूर आहेत पण त्या जंगलाच्या आतील बाजूला नाहीत तर नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेल्या आहेत. या मुलांना जंगलामधील ४० दिवसांच्या कालावधीत वन्यपशूंबरोबरच मुसळधार पावसाचाही सामना करावा लागला. या जंगलामध्ये काही सशस्त्र टोळ्यादेखील आहेत. या संकटाचाही मुलांना सामना करावा लागला का याचाही तपास केला जाईल.

मुलांचा शोध कसा घेण्यात आला?

हे जंगल साधारण २० हजार किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. मुलांच्या शोध मोहिमेसाठी सरकार, आदिवासी जमाती आणि लष्कराने एकत्रितरीत्या सहभाग घेतला होता. त्यामध्ये १५० लष्करी कर्मचारी आणि आदिवासी जमातीच्या १०० जणांचा समावेश होता. शोधमोहिमेदरम्यान, लोकांना एका झोपडीजवळ दुधाची एक बाटली सापडली. तसेच एका ठिकाणी एका मुलाच्या पायाचा ठसा आढळला.

या मुलांची आजी फातिमा यांचा स्पॅनिश आणि आदिवासी भाषेत एक संदेश ध्वनिमुद्रित करण्यात आला. मुलांच्या शोधासाठी जंगलाच्या वरून जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हा संदेश ऐकवण्यात येत होता. तसेच जंगलांमधून फिरताना लहान लाऊडस्पीकरवरून देखील हा संदेश ऐकवला जात होता.

काय होते या संदेशामध्ये?

यामध्ये मुलांची आजीने म्हटले होते, ‘मला मदत करा. मी तुमची आजी बोलत आहे. तुम्हाला माझे म्हणणे समजत आहे ना? तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. लोक तुमचा शोध घेत आहेत. माझा आवाज ऐका आणि तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, म्हणजे हे लोक तुम्हाला शोधू शकतील’. या आजींनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली आहे. आता मला कोणी आई म्हणणार नाही. त्यामुळे मला माझ्या नातवंडांचा शोध घ्यायचा आहे.

हेही वाचा : १५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने हवेत घेतला पेट, थरकाप उडवणारा VIDEO

निसर्गाबद्दल आदिवासींची काय भावना आहे?

दुसरीकडे अनेकांना आदिवासी आणि निसर्गाच्या संबंधांबद्दल खात्री होती. ही मुले निसर्गाचीच लेकरे आहेत, त्यामुळे निसर्गदेवतेच्या सान्निध्यात असताना त्यांना काहीही इजा होणार नाही असा विश्वास बाळगणारे अनेक जण होते. आदिवासी मुलांना जंगलात जिवंत राहता येते, त्यामुळे त्यांना काही होणार नाही असा आदिवासींना विश्वास होता. विशेष म्हणजे आदिवासींच्या अभ्यासकांचीही काहीशी अशीच भावना होती. निसर्गदेवता स्वतःच लोकांचे रक्षण करते, या मुलांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक वस्तूही निसर्ग त्यांना मिळवून देईलच असे ते सांगत होते. या घटनेचे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी ज्या प्रकारे वार्तांकन केले, ज्या भाषेचा वापर केला, त्यावरून मुख्य प्रवाहातील समाजाला आदिवासींबद्दल किती कमी माहिती आहे हे दिसून येते असे आदिवासी समुदायांच्या तज्ज्ञांना वाटते. आधुनिक जगाला आदिवासींची जगण्याची मूळ प्रेरणा, त्यासाठी आत्मसात केले जाणारे कौशल्य आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते याची किमान माहिती कथित मुख्य प्रवाहातील लोकांना असली पाहिजे असे या घटनाक्रमावरून जाणवते. ‘या उदाहरणाची इतिहासात कायमची नोद होईल,’ या कोलंबियाच्या अध्यक्षांच्या भावनेशी सर्वच सहमत होतील.