हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी सत्तारूढ वायएसआर काँग्रेसला विजय मिळत गेला. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात तीन ठिकाणी आंध्रमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसमला यश मिळाले. हे निकाल वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जाते. तर माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या राजकारणाला यातून बळ मिळणार असे सांगितले जाते.

निकालांचे महत्त्व…

पदवीधर मतदारसंघाचे निकाल हे जरी राज्याचे सार्वत्रिक चित्र दर्शवत नसले तरी, ज्या तीन ठिकाणी निकाल जाहीर झालेत, त्यात राज्यातील १७५ विधानसभा मतदारसंघांपैकी १०० मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळेच हे निकाल महत्त्वाचे ठरतात. श्रीकाकुलम-विजयनगरम-विशाखापट्टणम, प्रकाशम-नेल्लोर-चित्तूर तसेच कर्नूल-कडाप्पा-अनंतपूर हे ते तीन मतदारसंघ. राज्यात एकूण पाच पदवीधर मतदारसंघ आहेत. त्यातील तीन ठिकाणी सोमवारी मतदान झाले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत १५१ जागा जिंकत जगनमोहन रेड्डी सत्तेत आले. त्यावेळी तेलुगु देसमला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. लोकसभेतही त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या चंद्रबाबूंच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसली. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत तिसऱ्या आघाडीचा त्यांचा प्रयत्न फसला. काँग्रेसशी आघाडीही कामी आली नाही. मात्र आता या निकालाने चंद्राबाबूंना काही प्रमाणात बळ मिळाले आहे.

विश्लेषण : राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा, पण नेमके आरोप काय? जाणून घ्या

भाजपची द्विधा मन:स्थिती…

आंध्रचे विभाजन होण्यापूर्वी राज्यात लोकसभेच्या ४२ जागा होत्या. २००४ मध्ये जनगमोहन यांचे वडील वाय.एस.राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला राज्यातून २९ जागा मिळवून देत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्याच्या विभाजनानंतर आंध्रमध्ये २५ तर नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७ जागा राहिल्या. त्या अर्थाने आंध्रचा प्रवास मोठ्या राज्याकडून मध्यम आकाराच्या राज्याकडे झाला. त्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरील प्रभावावर झाला. शेजारच्या तेलंगणमध्ये भाजपचे उत्तम संघटन आहे. मात्र आंध्रमध्ये पक्षाचे अस्तित्व फारसे नाही. आताही लोकसभेला राज्यातील चार ते पाच जागा सोडल्या तर उर्वरित जागी स्वबळावर भाजप लढत देईल अशी स्थिती नाही. जनगमोहन यांचा वायएसआर काँग्रेस विरुद्ध चंद्राबाबूंचा तेलुगु देसम असाच प्रमुख सामना आहे.

राष्ट्रीय पातळीवर जगनमोहन यांचे धोरण भाजपला न दुखावण्याचे आहे. राज्यसभेत गरज पडेल तेव्हा त्यांच्या पक्षाने भाजपला अनुकूल भूमिका घेतली आहे. अर्थात ते भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही सामील झालेले नाहीत. त्याचबरोबर भाजपचा देशभरात प्रादेशिक पक्षांशी टोकाचा संघर्ष सुरू असताना, जनगमोहन यांच्याबाबत भाजप नेतृत्वाने तितकी आक्रमक भाषा वापरलेली नाही. स्थानिक नेते जी टीकाटिप्पणी करतात तेवढीच. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने आंध्रला मदत देण्याच्या मुद्द्यावर भाजपची मैत्री तोडली. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींवर आरोपांची राळ उडवत देशभर दौरे केले. मात्र लोकसभेला केवळ तीन जागा मिळाल्यानंतर चंद्राबाबू आंध्रच्या बाहेर पडलेच नाहीत. आता भाजपबरोबर पुन्हा जाण्याच्या प्रयत्नात ते असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत त्यांच्या पक्षाचा आणि भाजपचा थेट संपर्क झाला नसल्याचे तेलुगु देसमच्या एका नेत्याने स्पष्ट केले होते. मात्र भाजपबरोबर काम करण्यात अडचण नाही अशी पुस्ती त्याने जोडली होती.

विश्लेषण : अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत करणारा मनप्रीत सिंग कोण आहे? वाचा सविस्तर

नवी आघाडी कितपत शक्य?

आंध्रमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. अभिनेते पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षाशी भाजपशी जवळीक आहे. पवनकल्याण यांनी मध्यंतरी एक यात्रा काढून जगनमोहन सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली. दक्षिणेकडील राजकारणात अभिनेत्यांचा दबदबा असतो. सभांना गर्दी होत असली तरी, प्रत्यक्षात मते किती पडणार हा मुद्दा आहे. राज्यात जगन यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी विरोधी ऐक्य गरजेचे आहे. त्यामुळे तेलुगु देसमच्या नेतृत्वात सारे पक्ष एक येणार काय, हा मुद्दा आहे. चंद्राबाबू पुन्हा भाजपबरोबर जातील काय, या शक्यतेचाही विचार सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये चंद्राबाबूंनी फारसा रस दाखवलेला नाही. आंध्रमध्ये काँग्रेसचेही फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसशी आघाडी करूनही कितपत लाभ होईल याबाबत शंकाच आहे. अशात काही नवी राजकीय समीकरणे आकार घेतात काय याची उत्सुकता आहे.

विधान परिषद निकालाने आंध्रमध्ये सत्ताधाऱ्यांबाबत नाराजीचे संकेत काही प्रमाणात मिळत आहेत. अर्थात विधान परिषदेच्या तीन जागांच्या निकालातून जगनमोहन यांची सत्ता जाईल असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पण राज्यातील विरोधकांना यातून एक संधी दिसत आहे. यात देशात एकेकाळी बिगर काँग्रेस, बिगर भाजप पक्षांची मोट बांधण्यात आघाडीवर असलेले ७२ वर्षीय चंद्रबाबू नायडू नेमकी काय भूमिका घेतात याचे औत्सुक्य आहे. नव्या राजकीय आघाडीची शक्यता या निकालाने निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh politics chandrababu naidu popular ysr jaganmohan reddy print exp pmw
First published on: 24-03-2023 at 11:23 IST