हरयाणा तसेच पंजाबमध्ये भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना मोठ्या अपेक्षा आहेत. हरयाणात १० तर पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. हरयाणात गेल्या वेळी भाजपने सर्व १० जागा जिंकल्या होत्या. तर पंजाबमध्ये अकाली दलाच्या मदतीने भाजपला २ जागांवर यश मिळाले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. हरयाणात भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. तर पंजाबमध्ये अकाली दल हा जुना पक्ष साथीला नसल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला या दोन्ही राज्यांत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एकूणच हरयाणा, पंजाब तसेच चंडीगडमधील एकमेव जागा अशा एकूण २४ जागांच्या निकालातून काँग्रेस, भाजपसह आम आदमी पक्षाची भविष्यातील राजकीय दिशा ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणात भाजपपुढे चिंता

हरयाणात भाजपला दुहेरी समस्या भेडसावतेय. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तिसऱ्यांदा सरकार आणण्यासाठी पक्ष वेगवेगळी रणनीती आखत आहे. बिगरजाट नेते मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून इतर मागासवर्गीय समाजातील नायबसिंह सैनी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली. महागाई, बेरोजगारी याबरोबरच शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांमुळे भाजपला राज्यात सर्व दहा जागा पुन्हा निवडून आणणे अशक्य आहे. त्यातच दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाशी (जेजेपी) आघाडी तुटल्याने भाजपचा मार्ग सोपा नाही. हरयाणा, पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला. यामुळे हरयाणात किमान एक ते तीन जागा यंदा काँग्रेसला मिळतील अशी शक्यता आहे. त्यात राज्यात आम आदमी पक्षाशी त्यांची आघाडी आहे. त्याचाही काही प्रमाणात लाभ होईल. आघाडीत कुरुक्षेत्र मतदारसंघ काँग्रेसने आपला सोडलाय.

हेही वाचा…Prajwal Revanna Sex Scandal: अपहरण-लैंगिक छळ प्रकरणात एचडी रेवण्णा यांना जामीन कसा मिळाला?

चुरशीच्या लढती

कर्नाल मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा सामना काँग्रेसच्या दिव्यांशू बुद्धिराजा यांच्याशी आहे. मात्र वैयक्तिक प्रतिमेच्या जोरावर खट्टर यांना संधी असल्याचे मानले जाते. सिरसा मतदारसंघात भाजपचे अशोक तन्वर यांच्या विरोधात काँग्रेसकडून कुमारी शैलजा रिंगणात आहेत. दोन माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये हा चुरशीचा सामना आहे. काँग्रेसच्या दृष्टीने अपेक्षा असणारा मतदारसंघ म्हणजे रोहटक. येथे भाजपने खासदार अरविंद शर्मा यांना पुन्हा उमेदवारी दिली असून, त्यांची लढत काँग्रेसचे दीपेंदरसिंह हुड्डा यांच्याशी होतेय. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपेंदरसिंह हुड्डा यांचे ते पुत्र असून, या कुटुंबाचा मतदारसंघात प्रभाव आहे. गेल्या वेळी चुरशीच्या लढतीत दीपेंदरसिंह पराभूत झाले होते. राज्यात लोकदल तसेच जेजेपी हे स्थानिक पक्ष हिस्सारसारख्या जागांवर लढतीत आहेत. मात्र दहापैकी सहा ते सात जागांवर दुरंगीच सामना होतोय. राज्यात जर सध्याच्या दोन जागा गमवाव्या लागल्या तर पंजाबमध्ये त्याची भरपाई होईल काय, याची चाचपणी भाजप नेतृत्व करत आहे.

आयात नेत्यांवर भाजपची भिस्त

पंजाबमध्ये तीन दशकांहून अधिक काळ भाजपची अकाली दलाशी आघाडी होती. कृषी कायद्यांवरून अकाली दलाने युती तोडली. राज्यात आम आदमी पक्षाचे (आप) सरकार सत्तेत असून काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. अकाली दलाचा पारंपरिक मतदार आपकडे गेल्याने भाजपने आघाडीबाबत फारसे स्वारस्य दाखवले नाही. लोकसभेला स्वबळावर लढताना काँग्रेसमधून नेते घेऊनच भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यातील १३ पैकी दोन ते तीनच मतदारसंघात जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिलीय. उर्वरित आठ ते नऊ ठिकाणी काँग्रेस किंवा आम आदमी पक्षातून आलेल्यांना उमेदवारी बहाल केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे मूळचे काँग्रेसचे. याखेरीज रवनीत बिट्टू, सुशीलकुमार रिंकू, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर या पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. हिंदूंचा पक्ष अशी पंजाबमध्ये भाजपची प्रतिमा आहे. मात्र यंदा स्वबळावर लढताना शीख समुदायातील व्यक्तींना संधी देत भाजपने रणनीतीत बदल केलाय. गेल्या वेळच्या दोन जागा राखताना नव्याने काही जागा मिळवून राज्यात स्वतंत्रपणे एक ताकद निर्माण करण्याची भाजपची धडपड आहे. मात्र शेतकरी आंदोलन पाहता राज्यातील ग्रामीण भागातील जागांवर यश मिळवणे अवघड आहे. ग्रामीण भागात प्रचारावेळी हरयाणाबरोबरच पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला उमेदवारांना तोंड द्यावे लागले. तरीही लुधियाना, गुरुदासपूर, पतियाळा, जालंधर येथील जागांवर भाजपची स्थिती चांगली दिसते.

हेही वाचा…‘शिक्षा’ म्हणून तैवानभोवती चीनने सुरू केल्या सैन्यदल कवायती! केवळ धमकी की युद्धाची रंगीत तालीम?

आप, काँग्रेस यांच्यात स्पर्धा

विरोधकांच्या देशव्यापी आघाडीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष आहे. या पक्षांची दिल्ली, हरयाणा तसेच गुजरातमध्ये आघाडी आहे. मात्र पंजाबमध्ये हे एकमेकांच्या विरोधात आहेत. पंजाबमध्ये गेल्या वेळी काँग्रेसला ८ तर भाजप-अकाली दल यांच्या आघाडीला ४ व आपला १ जागा मिळाली होती. लोकसभेला देशातून जर दोन आकडी जागा मिळवायच्या असतील तर पंजाबमधून अधिक जागा जिंकणे आपसाठी गरजेचे ठरते. त्यांनी सर्व १३ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला असला, तरी काँग्रेसची त्यांना टक्कर आहे. राज्य सरकारने अनेक आश्वासनांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे आपबाबत नाराजी दिसते. यातून काँग्रेसला संधी असली तरी, गेल्या वेळच्या आठ जागा राखण्याची शक्यता फारच कमी आहे. काँग्रेसला देशात अधिकाधिक जागा मिळवायच्या असतील तर, पंजाब राज्य महत्त्वाचे ठरते. अकाली दलासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांना भटिंडा मतदारसंघ राखण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत. राज्यात पहिल्यांदाच चौरंगी सामना असल्याने भाकीत वर्तवणे कठीण दिसते. मोठ्या प्रमाणात मत विभागणीने चुरस आहे. राज्यात ३२ टक्के दलित मतदार आहेत. पूर्वी राज्यात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव होता. मात्र आता ती स्थिती राहिलेली नाही.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s path tough in haryana punjab are the rulers worried about the displeasure of farmers print exp psg
First published on: 25-05-2024 at 12:06 IST