भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नेहमीच महिला हिताच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतात. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष कोणताही असला तरी एखाद्या मुद्द्यावर हिरिरीने संघर्ष करतात. राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाले. या मुद्द्यावर चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली. राज्यात त्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील ज्येष्ठ नेते. मात्र सत्तासमीकरणे बदलली, राठोड यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. राज्यात शिंदे गट-भाजप सत्तेत आला. राठोड यांनाही पुन्हा मंत्रिपद मिळाले. त्यामुळे चित्रा वाघ यांची कोंडी झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राठोड यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता याच मुद्द्यावर विदर्भ दौऱ्यात असताना पत्रकारांशी त्यांचा खटका उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!

विदर्भ दौऱ्यात वाद कुठे उद्भवला?

महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यभर दौरा करत असताना विदर्भात त्यांचा प्रवास होता. त्या वेळी अमरावतीत त्यांना पत्रकारांनी राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, या मुद्द्यावर न्यायालयात लढा सुरूच राहील असे उत्तर वाघ यांनी दिले. त्याचबरोबर इतरही प्रश्न आहेत असे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या दिवशी यवतमाळला पत्रकार परिषद होती. हा संजय राठोड यांचा गृहजिल्हा. साहजिकच पुन्हा राठोड यांचाच मुद्दा उपस्थित झाला. राठोड यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करत आहात काय, असा एका पत्रकाराच्या प्रश्नाचा रोख होता. त्यावर मग चित्रा वाघ आणि संबंधित पत्रकार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुपारीबाज… वगैरे म्हणण्यापर्यंत हा वाद वाढला. पुढे वर्धा येथे चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होती. त्यावर बहिष्कार टाकण्यात आला. पत्रकारांच्या बहिष्काराचा मुद्दाच चर्चेत राहिला, यातून वाघ यांनी संघटनात्मक कामासाठी जो दौरा केला तो मूळ मुद्दा काही दुर्लक्षित राहिला. माध्यमी चर्चेच्या केंद्रस्थानी वादाचाच मुद्दा राहिला. अर्थात नंतर चंद्रपूर, गडचिरोली असा त्यांचा दौरा सुरळीत झाला. पण यवतमाळमध्ये संघर्ष झाला, त्यातून राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणातील अपरिहार्यपणा अधोरेखित झाला.

आणखी वाचा – ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

राठोड मुद्द्यावर संघर्ष अवघड?

राठोड यांच्याशी संबंधित प्रकरणात संघर्ष सुरूच राहील असे चित्रा वाघ यांनी नमूद केले आहे. मात्र राज्यातील दोन पक्षांची आघाडी पाहता या मुद्द्यावर पूर्वीप्रमाणे म्हणजे विरोधात असताना जसा संघर्ष केला, तशी भूमिका मांडणे त्यांना कठीण दिसते. 

आणखी वाचा – विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

संघटना आणि संघर्ष…

चित्रा वाघ विविध मुद्द्यांवर वारंवार संघर्ष करत असल्याचे दिसून आले आहे. समाजमाध्यमांवरही त्या खूपच सक्रिय आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्याकडे पक्ष संघटनेतील महत्त्वाची अशी जबाबदारी सोपवली आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी पक्षात तुलनेत नव्या असलेल्या व्यक्तीकडे पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी देणे ही भाजपसारख्या कार्यकर्ता आधारित (केडरबेस) संघटनेत ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांना संघटनकौशल्य दाखविण्याची संधी आहे. मात्र विनाकारण वाद ओढवून घेतल्यास विषयही भरकटेल आणि मूळ हेतूही साध्य होणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh is always fighting controversy with her firebrand politics print exp scsg
First published on: 16-11-2022 at 08:00 IST