गेले वर्ष अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी गाजले. याच यादीतील आणि नुकतीच घडलेली घटना म्हणजे १३ डिसेंबर रोजी संसदेतील घुसखोरी आणि त्यानंतर पिवळ्या धुराचा हल्ला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. संपूर्ण देशच या घटनेनी ढवळून निघाला. या घटनेसंदर्भात समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या. संसदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संसदेसारख्या अतिमहत्त्वाच्या वास्तूची यंत्रणा कमकुवत कशी असू शकते यावर सखोल ऊहापोह करण्यात आला. आज वर्षातील शेवटचा दिवस आहे, त्याच निमित्ताने संसद भवनाची सुरक्षा कशी भेदली गेली, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या, संसदेच्या नवीन इमारतीतील सभागृहाच्या मजल्यापासून अभ्यागतांच्या गॅलरीची कमी झालेली उंची, उशिरा येणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि शूज किंवा बूट यांच्या तपासणीला दिलेली बगल असी काही महत्त्वाची कारणं संसदेतील घुसखोरीनंतरच्या चौकशीत आता समोर आली आहेत. अलीकडेच लोकसभेच्या सुरक्षा भंगास कारणीभूत ठरलेल्या कारणांचा शोध तातडीने घेण्यात आला. या सुरक्षेतील त्रुटींबद्दल संसद सुरक्षा सेवा आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेली ही विशेष माहिती…

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

१३ डिसेंबर पूर्वी काय घडले?

दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा शाखेने संसदेच्या आणि आसपासच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली होती. खलिस्तानी फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याने ६ डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर ही बैठक पार पडली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संसदेतील पोलीस तैनात वाढविण्याकरिता शिवाय एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु यामागे पन्नूनच्या धमकीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे पोलीस सांगतात. गेल्या महिनाभरात दिल्ली पोलिसांनी २५० ची संख्या वाढवून ३०० पोलीस तैनात केले.

नवीन संसद भवन आणि सुरक्षा यंत्रणेचा अभाव

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शर्मा आणि मनोरंजन डी दुपारी १ वाजण्याच्या आधी व्हिजिटर्स गॅलरीत पोहोचले. एकूण सहा गॅलरी आहेत. खासदारांच्या सभागृहातील आसनव्यवस्थेच्याच बरोबर वरच्या बाजूस या सहा गॅलरीज आहेत. सर्वात पुढची ओळ त्यांच्यावर अंदाजे साडे दहा फुटांवर आहे. ही उंची पूर्वीच्या संसद भवनाच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे घुसखोराला सहज उडी मारता आली. “तसेच तिथे अशा गोष्टी घडण्यापासून रोखण्यासाठी कोणताही महत्त्वाचा अडथळा किंवा भिंत नाही,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसभा अध्यक्ष आणि विविध स्तरावरील नेत्यांच्या बैठकीत अभ्यागतांच्या गॅलरीसमोर काच बसवण्याची सूचना करण्यात आली होती. संसदेच्या सुरक्षा सेवेच्या एका कर्मचाऱ्याने ज्यात CRPF आणि दिल्ली पोलिसांचा समावेश आहे, त्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की विशेषत: नवीन संसदेचे उद्घाटन झाल्यापासून दररोज शेकडो अभ्यागत येत आहेत आणि त्या तुलनेत कर्मचारी संख्या मर्यादित आहे.

अधिक वाचा: भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात? 

गरज ३०१ अधिकाऱ्यांची परंतु प्रत्यक्षात होते केवळ १७६

सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे ३०१ सुरक्षा अधिकारी संसदेत तैनात असतात, परंतु ज्या बुधवारी ही घटना घडली त्या दिवशी केवळ १७६ सुरक्षा अधिकारीच तैनात होते. “आमच्याकडे विद्यार्थी आणि पाहायला येणारे अभ्यागत बसमध्ये येत असतात… आम्हाला प्रत्येकाचा पास आणि आयडी तपासावा लागतो,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसर्‍या अधिकाऱ्याने सांगितले की ‘त्या’ दोघांनी त्यांच्या शूजमध्ये रंगीत धुराचे डबे लपवले होते, जे सहसा तपासले जात नाहीत.
“आमच्याकडे स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर आहेत. सर्व पॉईंट्सवर फ्रिस्किंग देखील केले जाते. परंतु, आम्ही सहसा शूज तपासत नाही… प्रथमदर्शनी, स्मोक बॉम्ब प्लास्टिकचे दिसतात, म्हणून मशीनमध्ये ते दर्शविले गेले नाहीत,” एका अधिकाऱ्याने सांगितले, की हे दोघे जण एका खासदाराच्या गाडीमधून आले होते. शिफारशीने त्यांना या सुरक्षिततेच्या स्तरांवरून जाण्यास मदत केली. २००१ च्या संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त, लोकसभेच्या सुरक्षेचा मोठा भंग झाला, जेव्हा दोन घुसखोरांनी अभ्यागत गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली आणि धुराचे डबे उघडले. दरम्यान, संसदेबाहेर रंगीत धूर घेऊन निषेध केल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर अधिवेशनात सभागृहातील पाहुण्यांचा प्रवेश बंद करण्यात आला. असे दिसून आले की, सुरक्षेच्या उल्लंघनाच्या एक दिवस आधी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) संसदेच्या संकुलासाठी गॅझेट्स आणि बुलेटप्रूफ अडथळ्यांसह अतिरिक्त सुरक्षा पायाभूत सुविधांसाठी निविदा काढली होती.