जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी घसरणीला लागली असताना भारतीय बाजारपेठ ईव्ही कार एसयूव्हीकडे आकर्षिक झाली आहे. आगामी वर्षात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पारंपरिक इंधनचालित वाहनांपेक्षा अधिक नोंदवली जाईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भारत जागतिक ईव्ही वाहनांसाठी राजधानी होईल, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. 

ईव्ही वाहनांच्या खपामागील कारणे कोणती?

२०२५ वर्षअखेरीस पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांहून अधिक ईव्ही कार विक्रीसाठी आणल्या जातील, असा भारतीय बाजाराला भरवसा आहे. २८ नवीन वाहनांपैकी १८ ही (ईव्ही) विजेवर धावणारी असतील. तसे नियोजन कारनिर्मिती कंपन्यांनी कागदावर आखले आहे. एकूण कार विक्रीच्या चार टक्के अर्थात दुप्पट खपाचे उद्दिष्ट असेल. यात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एमजी आणि बीवायडी या प्रमुख कंपन्यांचा समावेश असेल. गेल्या दोन वर्षांत बाजारात चार ते पाच ईव्ही मॉडेल आणली गेली, हे त्याचे द्योतक आहे. अनुक्रमे २०२३ आणि २०२४ मध्ये बाजारात आलेल्या एकूण ईव्ही आणि पारंपरिक इंधनावरील ११ आणि १५ ही वाहनसंख्याही ईव्ही वाहनांनी मागे टाकली आहे. वाहन उद्योगातील वाढीला शून्य उत्सर्जन वाहनांमुळे गती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जाणकारांच्या मते, यंदाच्या वर्षी बाजारात २ लाखांहून अधिक ईव्ही प्रवासी वाहने आणली जातील. त्यामुळे २०२५च्या अखेरीस एकूण कार खपाच्या चार टक्के इतका वाटा हा ईव्ही कारचा असेल. अर्थात ही वाढ दुप्पट असेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ईव्ही वाहनविक्रीमागील प्रमुख कारण

बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यास उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यात कंपन्यांना सोपे जाईल आणि प्रमुख क्षमता तंत्रांचा उत्पादकांना कारनिर्मितीत वापर करावा लागेल, असे डन्स्टर येथील प्रगत निर्मिती संशोधन संस्थेचे प्रमुख करण गुप्ता म्हणाले. ईव्ही कार उत्पादनातील जागतिक स्थित्यंतर घडताना निर्मिती क्षमता आधी पडताळली गेली पाहिजे. त्यासाठी कल्पकता आवश्यक आहे. नव्या मानकांची आवश्यकता आहे. त्यातून उत्पादकता वाढविण्यास मदत होईल, अशी या क्षेत्रातील तज्ज्ञांना आशा आहे.

ईव्ही आणि एसयूव्ही

ईव्ही कार निर्मिती क्षेत्राचा बाजारातील सर्वसमावेशक वार्षिक वाढीचा दर हा ४३ टक्के इतका राहील, अशी अटकळ आहे. २०३० पर्यंत ९ लाख ३२ हजार युनिट्स बाजारात आणले जातील. यात इलेक्ट्रिक एसयूव्हीला सर्वाधिक ६१ टक्के मागणीची अपेक्षा आहे. तुलनेचा विचार केल्यास २०२४ मध्ये ईव्ही वाहनांचा खप एक लाख ७ हजार असा माफक राहिला. तर अंदाजे सेडान आणि एसयूव्ही मिळून ४० लाखांहून अधिक कार संपूर्ण भारतात विकल्या गेल्या.

प्रगत तंत्रामुळे उत्पादन खर्च कमी?

सर्व प्रकारच्या ग्राहक उत्पादनांतील लिथियम बॅटरी हा महत्त्वाचा भाग राहील. त्यातही घनीभूत लिथियम आयन बॅटरी हा उत्पादनांतील मध्यवर्ती घटक असेल. जागितक अर्थव्यवस्थांना नव्याने आकार देण्यास लिथियम बॅटरीचे उत्पादन पूरक ठरेल, असे हेन्री हार्विन एज्युकेशनच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिकच्या सल्लागार मंडळातील सदस्य प्रभज्योतकौर जुनेजा म्हणाल्या. लिथियम बॅटरी तंत्रज्ञानात जे मूलभूत संशोधनाचा वापर करतील, त्यांच्यासाठी ही वाट अधिक सोपी आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात करणे शक्य होईल. त्यामुळे क्षमतावाढीसाठी आवश्यक जागतिक प्रभाव आणि ऊर्जेचा कमीत कमी वापर करून स्रोतांचा व्यापक स्तरावर वापर करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपन्यांची भविष्यातील उत्पादने…

भारतातील प्रमुख ईव्ही कार उत्पादन कंपन्यांनी आपली नव्याने उत्पादने बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सिएरा आयसीई सादर केली. ही कार १.२ लिटर पेट्रोल इंजिन आणि २ लिटर डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. २०२५च्या अखेरीस मारुती सुझुकीही त्यांची ई-ग्रँड विटारा एसयूव्ही बाजारात आणणार आहे. ई-विटारामध्ये दोन बॅटरी पर्याय उपलब्ध असतील. ज्यात ५०० किलोमीटरचा टप्पा निश्चित करता येईल. एमजी कंपनी मॅजेस्टर ही प्रीमियम दर्जाची ई-एसयूव्ही बाजारात आणेल. या एसयू्व्हीचा स्तर ग्लॉस्टरपेक्षा थोडा वरचा असेल. शिवाय बीवायडी कंपनी सात आसनी सी-लायन ही इलेक्ट्रिक एसयूव्ही आणेल, जिच्यात ५६७ किलोमीटरचा टप्पा मिळेल.