इन्स्टाग्रामवर ‘द गटलेस फूडी’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या फूड ब्लॉगर नताशा डिड्डी यांचे रविवारी २४ मार्च रोजी पुण्यात निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. ही बातमी समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पतीनंही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यात. माझी पत्नी नताशा डिड्डी उर्फ द गटलेस फूडी हिच्या दुःखद निधनामुळे मला अत्यंत वेदना झाल्यात. तिचे @thegutlessfoodie हे Instagram पेज जिवंत अन् सक्रिय ठेवले जाणार आहे, कारण तिच्या पोस्ट आणि कथा बऱ्याच लोकांना प्रेरित करतात हे मला ठाऊक आहे. तिचे बरेच फॉलोअर्स वारंवार तिच्या रेसिपीसाठी पेजवर येत असतात आणि प्रकाशित मजकूर अनेकांसाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून काम करीत आहे, असंही तिचे पती सांगतात.

२०१८ मध्ये फूड ब्लॉगर नताशा यांना ट्यूमरमुळे पोट गमवावे लागले होते. पोटाशिवाय जगण्यासाठी डिड्डी यांना आहाराची अनेक बंधनं अन् समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्या नेहमीच थोडं थोडकं खायच्या. त्यांनी आपल्या प्रदीर्घ आजाराचे एका संधीत रूपांतर केले. घरच्या घरी अन्नाचे वेगवेगळे पदार्थ बनवून स्वतःचे नाव कमावले. तणावामुळे मला पोटाचा विकार झाला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी आधीच्या मुलाखतींमध्ये त्यांनी पोटात वाढलेल्या गाठी काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. तसेच त्यांना मळमळ, चक्कर येणे आणि खाल्ल्यानंतर थकवा जाणवणे यांसारख्या लक्षणांचा प्रत्यय आला. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यांना डंपिंग सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराची लक्षणे दिसू लागली.

डंपिंग सिंड्रोम म्हणजे काय?

डंपिंग सिंड्रोम हा एक वैद्यकीय विकार आहे, ज्यामध्ये तुमचे पोट नेहमीपेक्षा अधिक वेगाने रिकामे होते. जेव्हा तुमचे पोट खूप लवकर रिकामे होते, तेव्हा तुमच्या लहान आतड्यांना शरीरातील खराब पचलेले अन्न मोठ्या प्रमाणात मिळते. याला रॅपिड गॅस्ट्रिक एम्प्टिंग असेही म्हणतात. शरीरातील ही वैद्यकीय स्थिती बऱ्याचदा जेवणानंतर लगेच उद्भवते आणि तुम्हाला शौचास होते. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, पोटावर किंवा अन्न नलिकेच्या आजूबाजूच्या कोणत्याही जागेवर शस्त्रक्रिया झालेली असल्यास हा विकार उद्भवतो. डंपिंग सिंड्रोम दोन प्रकारचा असतो. प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार लवकर म्हणजेच जेवणानंतर १० ते ३० मिनिटांनी त्याची लक्षणे जाणवू लागतात, तर उशिरा म्हणजे जेवण केल्यानंतर १ ते ३ तासांनंतही लक्षणे पाहायला मिळतात.

हेही वाचाः विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

या सिंड्रोममध्ये नेमके काय होते?

सिंड्रोमची लक्षणे जाणवल्यानंतर पोट नैसर्गिकरीत्या रिकामे होण्यास सुरुवात होते. लहान आतड्यांमधीलही मल ते बाहेर फेकते. त्यामुळे आपल्या शरीरातील पचन क्रिया बिघडते आणि जठरासंबंधीची हालचाल वाढते. खरं तर शौचास जाण्याच्या वेळी स्नायू आणि नसा एकत्रित कार्य करीत असतात. यातील कोणतीही क्रिया बिघडली तर अधिक नुकसान होऊ शकते. तुमचे पोट रिकामे झाल्यामुळे पायलोरिक व्हॉल्व्ह उघडतो आणि तुम्ही खाल्लेले सर्व अन्न न पचताच बाहेर फेकले जाते. त्यामुळे शरीरातील लहान आतडे इतर अवयवांच्या संपर्कात येऊन अधिक द्रवपदार्थ खेचून घेतात. तसेच अर्धवट पचलेल्या अन्नाच्या बरोबरीने ते द्रव पदार्थ जागा व्यापण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लोकांना ही लक्षणे दिसू लागतात.

हेही वाचाः ड्रग्ज प्रकरणात माजी IPS अधिकारी संजीव भट्ट दोषी; काय आहे प्रकरण?

त्याची लक्षणे काय आहेत?

डंपिंग सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये अतिसार, उलट्या, चक्कर येणे, मळमळ, फुगलेले पोट, हृदयाचा ठोका वाढणे, पोटदुखीचा समावेश असतो. तर उशिरा डंपिंग सिंड्रोमची लक्षणे तुम्ही खाल्ल्यानंतर सुमारे दोन ते तीन तासांनी दिसू लागतात. यामध्ये भूक लागणे, थकवा, मेंदूचे दुखणे, अशक्तपणा, चेहरा लाल होणे, घाम फुटणे, अस्वस्थता किंवा थरथरणे, हृदयाचे ठोके वाढणे यांसारख्या लक्षणांचा समावेश असतो. काही जणांमध्ये लवकर आणि उशिरा अशी दोन्ही लक्षणे आढळून येऊ शकतात.

ही लक्षणे किती सामान्य आहेत?

जॉन हॉपकिन्स मेडिकल सेंटरच्या अहवालानुसार, पोटावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केलेल्या प्रत्येक २० पैकी तीन रुग्णांना डंपिंग सिंड्रोमचा अनुभव येतो. डंपिंग सिंड्रोम बहुतेक प्रकरणांमध्ये धोकादायक किंवा प्राणघातक नसतो, परंतु गंभीर प्रकरणामुळे जलद वजन कमी होऊ शकते. डंपिंग सिंड्रोम असलेल्या ७५ टक्के लोकांमध्ये लवकर लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

त्यावर उपचार कसा केला जातो?

डंपिंग सिंड्रोमचे उपचार वेगवेगळे असतात. डॉक्टर औषधोपचार करतात, आहारातील बदल आणि काहीवेळा शस्त्रक्रिया याहून अधिक उपचारांची शिफारस करू शकतात. आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आहारातील उपायांमध्ये तीन वेळा जेवण अन् खाण्याऐवजी काही तासांचं अंतर ठेवून खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. अधिक प्रथिने आणि फायबरसह साखरयुक्त पदार्थ खाणे टाळणे पाहिजे, असेही डॉक्टर सांगतात.