रायगड जिल्ह्यातील पेण हे गणपतीचे गाव म्हणून नावारूपास आले आहे. शहरातील अनेक घरांतून बाराही महिने गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू असतो. सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगती यामुळे इथल्या मूर्तींना देशविदेशातून मागणी असते. दरवर्षी या व्यवसायात जवळपास ६० कोटींची उलाढाल होत असते. पेण गणेशमूर्तींचे गाव कसे बनले, याचा आढावा….

गणेशमूर्ती व्यवसायाची सुरुवात कशी झाली?

पेण शहरात गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरुवात झाली. ही सुरुवात नेमकी कशी झाली आणि कोणी केली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र पेणमध्ये पूर्वी जोशी, टिळक, आणि परांजपे यांच्यासारखे काही वतनदार राहात होते. त्यांच्याकडे विजापूरहून आलेले काही कारागीर काम करत होते. आपले कामकाज आटोपल्यावर हे लोक फावल्या वेळात मातीची खेळणी, भांडी आणि मूर्ती बनवत असत. या वस्तूंना चांगली मागणी मिळत असे. कोकणात जाणारे चाकरमानी या वस्तू व मूर्ती पेणमधून घेऊन जात असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव परंपरेला सुरुवात केल्यानंतर या मूर्ती कलेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मातीची खेळणी, भांडी हळूहळू बंद होत गेली. पण गणेशमूर्ती बनवण्याची कला नावारूपास आली. पेणमध्ये घरासमोरील मातीतून छोट्या आणि सुबक गणेशमूर्ती तयार होऊ लागल्या. याचदरम्यान कोकणात गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत गेल्याने पेणच्या गणेशमूर्तींना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली.

व्यवसायाचा विस्तार कसा होत गेला?

पेणचे कै. वामनराव देवधर आणि कै. राजाभाऊ देवधर यांनी या व्यवसायाला चालना दिली. पुढे त्यांच्याकडे शिकणार्‍या काही कारागिरांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि हा व्यवसाय भरभराटीस आला गेला. सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणेशमूर्तींना मागणी वाढत गेली. सुरुवातीला कोकण, त्यानंतर मुंबई-पुण्यात पेणच्या गणेशमूर्ती जायला लागल्या. हळूहळू राज्यभरातून पेणच्या गणेशमूर्तींना मागणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकात या मूर्तींची लोकप्रियता इतकी वाढली की कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तीना बाजारपेठ उपलब्ध झाली. अगदी अलीकडच्या काळात थायलँड, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि मॉरिश्यस या देशांमधे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांकडून आता पेणच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी येऊ लागली.

व्यवसायाची सद्यःस्थिती कशी आहे?

सुरुवातीला पेण शहरापुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय हळूहळू आसपासच्या परिसरात विस्तारित होत गेला. त्यामुळे गणेशमूर्ती बनवणाऱ्या कार्यशाळांची संख्यादेखील वाढत गेली. आज जोहे, हमरापूर, वडखळ या परिसरातही गणेशमूर्तींचे अनेक कारखाने सुरू झाले आहेत. कच्च्या गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ म्हणून जोहे, हमरापुर परिसराकडे पाहिले जाऊ लागले आहे. राज्यभरातील मूर्तिकार येथील कच्च्या मूर्ती विकत घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. तालुक्यात गणेशमूर्ती बनविण्याऱ्या लहानमोठ्या ५००हून अधिक कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. ज्यातून दरवर्षी साधारपणे ३० लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात, ज्यातून २५ ते ३० हजार लोकांना रोजगार संधी उपलब्ध होते.

व्यवसायातील अर्थकारण कसे चालते?

पेण तालुक्याच्या अर्थकारणात गणेशमूर्ती व्यवसायाचा मोठा वाटा आहे. गणेशोत्सवाचे १० दिवस सोडले तर वर्षभर येथे गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. यातून दरवर्षी साधारणपणे ६० ते ६५ कोटींची उलाढाल होते. गणेशमूर्ती बनविण्यासाठी फारशी यांत्रिक मदत घेतली जात नसल्याने, यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात अलीकडे महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरवर्षी जवळपास १५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या जात आहेत.

व्यवसायाचे स्वरूप कसे बदलत आहे?

पूर्वी पेणमध्येच फक्त शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवल्या जात असत. मात्र नंतर गणेशमूर्तींची मागणी वाढत गेल्याने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करण्याकडे मूर्तिकारांचा कल वाढत गेला. पेणमध्ये तयार होणाऱ्या ८० टक्के गणेशमूर्ती या पीओपीने बनविल्या जाऊ लागल्या. शाडूच्या मूर्ती बनवण्यास लागणारा वेळ आणि त्यांचा नाजूकपणा यामुळे मूर्तिकार पीओपीकडे वळले. पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या, मातीच्या तुलनेत मजबूत आणि फिनिशिंगसाठी चांगल्या असल्याने मूर्तिकारांनी हा पर्याय स्वीकारला. पण अलीकडच्या काळात पर्यावरणविषयक जागृती निर्माण झाल्याने, आणि मध्यंतरी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने पीओपीच्या गणेशमूर्ती नकोच अशी भूमिका घेतल्याने मूर्तिकारांकडून शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्यावर पुन्हा भर दिला जाऊ लागला आहे.

व्यवसायासमोरील आव्हाने कोणती?

पेणच्या गणेशमूर्तींना जगभरातून मागणी असली तरी या पुढील काळात हा व्यवसाय करणे जिकिरीचे होणार आहे. कारण दिवसेंदिवस गणेशमूर्ती कार्यशाळांची संख्या वाढते आहे. त्या तुलनेत मूर्तिकामासाठी चांगले मूर्तिकार आणि कुशल कारगीर मिळणेही कठीण झाले आहे. आजचा कारागीर उद्या आपल्याकडे येईल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. तर दुसरीकडे हाताने मूर्ती घडवणारे मूर्तिकार कमी होऊन साच्यातून मूर्ती काढणाऱ्या मूर्तिकारांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पेणच्या गणपती व्यवसायाला समूह विकास करण्याचे सर्व प्रयत्नही फसले आहेत. पीओपी गणेशमूर्ती असाव्यात की नसाव्यात यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहेत. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. पीओपीला बंदी घालायची असेलचतर मूर्तिकारांना पीओपीला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Story img Loader