भारताच्या इतिहासात अनेक आश्चर्यकारक प्रसंग आणि घटना आहेत. इंग्रजांच्या काळात भारतीयांना नव्याने ओळख झालेल्या बर्फाच्याबाबतीतही असेच काहीसे आढळून येते. भारतीयांना बर्फ माहीत होता की नाही, याविषयी अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. याविषयी भाष्य करताना संपूर्ण देशाला एकाच दृष्टिकोनातून पाहणे हे तत्त्वतः चुकीचे ठरणारे आहे. भारतातील भौगोलिक भिन्नतेनुसार बर्फाच्या ज्ञानाविषयी भाष्य करणे तुलनेने सोपे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारण बर्फाची ओळख भारतीयांना इंग्रजांच्या काळात झाली, असे मानले जाते. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, इंग्रजांच्या सुरुवातीच्या काळातील वसाहती मुख्यत्त्वे समुद्र किनारी किंवा प्रसिद्ध बंदराच्या परिसरात होत्या. त्यामुळे या भागातील स्थानिकांना बर्फ माहीत असण्याची शक्यता तुलनेने कमी होती असे, अभ्यासकांचे मत आहे.

इंग्रजांपूर्वी भारतातील बर्फाचा वापर

इंग्रजांनी कलकत्त्याला व उर्वरित भारताला बर्फाने मंत्रमुग्ध करण्याच्या सुमारे तीन शतके आधी मुघल सम्राट बाबराने हत्ती आणि घोड्यावरुन काश्मीर ते दिल्लीपर्यंत बर्फाची आयात केली होती, याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर इंग्रजांनी अशाच प्रकारे बर्फ काश्मीरवरून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ही पद्धत भरपूर खर्चिक असल्याने, त्यांनी आपला मोर्चा अखेरीस अमेरिकन बर्फाकडे वळविला.

आणखी वाचा : विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

अमेरिकेचा बर्फ

१८३८ साली प्रकाशित झालेल्या ‘ओरिएंटल हेराल्ड अॅण्ड कलोनिअल इंटेलिजन्सर’च्या पहिल्या आवृत्तीत सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतातील प्रतिष्ठित उत्पादन ठरलेल्या बर्फासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील युरोपियन वसाहतींनी उष्ण कटिबंधात जाचक तापमानाचा सामना कशा प्रकारे केला यावर प्रकाशझोत टाकणारे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याचा धांडोळा घेतला असता लक्षात येते की, उकाड्यापासून दूर जाण्यासाठी युरोपियनांनी हिल स्टेशन्स शोधून काढली. तिथपर्यंत जाण्याचे मार्ग तयार केले. त्याचाच परिणाम म्हणजे माथेरान, पाचगणी, दार्जिलिंग, सिमला, कुलूसारखी हिल स्टेशन्सची जंत्री देशभरात वाढत गेली. इंग्रज अधिकाऱ्यांसाठी ही उन्हाळ्यातील निवासाची ठिकाणे होती.

ईस्ट इंडिया कंपनी आणि बर्फ

१९ व्या शतकापर्यंत भारतातील उष्णतेवर मात करणारे आणखी एक माध्यम अमेरिकन बर्फाच्या माध्यमातून समोर आले. या आधी नमूद केल्याप्रमाणे भारतीय उपखंडात, बर्फाचा घरगुती वापर पूर्णपणे अज्ञात नव्हता. काश्मीरमधून बर्फ वाहून नेण्याच्या मुघलांच्या प्रथेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला, असे सांगणारे दस्ताऐवज उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी येणाऱ्या अतिखर्चाचा परिणाम जाणून ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या योजना बासनात गुंडाळल्या आणि त्याऐवजी अमेरिकन बर्फावर लक्ष केंद्रित केले. मूलतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काश्मीर आणि विस्तीर्ण हिमालयातून बर्फ कलकत्त्यात आणण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अपयशी ठरली होती, असे अभ्यासक मानतात.

बंगालमधील स्थानिक बर्फ कसा होता?

वास्तविक बंगालसारख्या ठिकाणी स्थानिकांना बर्फाची गरज फारशी भासली नव्हती. कारण बंगाल हा भाग हिमालय, नेपाळ, भूतान, सिक्कीम या भागांशी सलंग्न आहे. त्यामुळे डचांनी बंगालमध्ये ‘हुगळी बर्फ’ या नावाचे बर्फाचे उत्पादन सुरू केले. हा बर्फ मुळात चिनसुरा आणि हुगळी येथील अतिशय खोल खड्ड्यांत तयार झालेला पाणचट (बर्फाचा) गाळ होता. याच गाळाला ‘स्लश’ असे म्हटले जाते. हा ‘स्लश’ अर्थातच पिण्यायोग्य नव्हता. म्हणूनच युरोपियन वसाहतींमध्ये थंड पेयासाठी ‘स्लश’ वापरताना तो सर्वप्रथम एका मोठ्या कपामध्ये घेतला जात असे. त्यानंतर त्या मोठ्या कपामध्ये छोटा कप आतमध्ये ठेवून त्यात पेय ठेवले जात असे. म्हणजेच त्या स्लशच्या गारव्याने छोट्या कपातील पेय थंड होत असे. अशा प्रकारच्या बर्फाचा वापर डचांनी केला असे संदर्भ सापडत असले तरी या प्रकारचा स्लशचा वापर स्थानिक पातळीवर होत असावा, असे काही अभ्यासक मानतात.

अमेरिकेतून भारतात आलेला पहिला बर्फ

कलकत्त्याच्या बंदरावर सर्वात आधी अमेरिकेतून बर्फ आणला गेला. हा बर्फ मुख्यत्त्वे युरोपियन वसाहतींमधील लोकांना त्यांच्या स्थानिक- जुन्या परंपरेनुसार पेयांचा आनंद घेता यावा, यासाठी मागविण्यात आला. बोस्टन या अमेरिकन शहरातून ‘द क्लिपर टस्कनी’ नावाच्या जहाजावरून कलकत्त्याला पहिल्यांदा १८३३ (सप्टेंबर) साली बर्फ आयात करण्यात आला. त्यावेळी युरोपियन वसाहतींकडून जल्लोष साजरा करण्यात आला. हा बर्फ अनेक समुद्र ओलांडून सुमारे चार महिन्यांच्या प्रवासात टिकून राहिला होता आणि १०० टन बर्फ अखेरीस शहरातील वसाहतींमधील रहिवाशांपर्यंत पोहोचला होता, ही घटना इतकी मोठी होती की तत्कालीन बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर- जनरल विल्यम बेंटिक यांनी जहाजाचे चालक दल आणि विशेषत: मौल्यवान मालवाहतुकीचा प्रभारी असलेला विल्यम सी. रॉजर्स याचे जाहीर कौतुक केले होते.

अमेरिकन बर्फाचे जतन कशाप्रकारे करण्यात आले ?

बंगालमधील पहिल्या बर्फाच्या जतनगृहाच्या उभारणीची तत्कालीन किंमत १० हजार ५०० रुपये इतकी होती. परंतु प्राथमिक कालखंडात हे जतनगृह योग्य पद्धतीने काम करत नसल्याने, अतिरिक्त जतनगृहाची गरज भासली होती. यासाठी इंग्रज सरकारकडून पैशांच्या मदतीचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन खास करून महिलांना करण्यात आले होते, याचा स्पष्ट उल्लेख ओरिएंटल हेराल्ड अॅण्ड कलोनियल इंटेलिजन्सर मध्ये करण्यात आला आहे. या आवाहनातून महिलांनी १४५२ रुपये तर पुरुषांनी ६४३५ रुपये म्हणजेच एकूण ७९५९ इतकी रक्कम गोळा केली. हा बर्फ फक्त केवळ शहरातील युरोपियन लोकच अधिक वापरत होते.

अमेरिकेत ट्यूडर आइस कंपनीची स्थापना फ्रेडरिक ट्यूडर या व्यापाऱ्याने केव्हा केली, याविषयी ठोस माहिती देणारे कागदपत्र उपलब्ध नाहीत. परंतु त्याने किमान दोन दशके भारत- अमेरिका बर्फाच्या व्यापारावर अधिपत्य गाजविले, याचे संदर्भ सापडतात. बोस्टनमध्ये फ्रेडरिक ट्यूडरने स्थापन केलेली ट्यूडर आइस कंपनी ही एकमेव कंपनी होती, जी भारत आणि कलकत्त्याला त्यांच्या खास तयार केलेल्या जहाजांमधून अमेरिकेतील बर्फ निर्यात करत होती. स्थानिक पातळीवर कलकत्ता आणि इतर किनारी वसाहती शहरांमध्ये बर्फाची जतनगृहे उभारण्यात आली. रिचर्ड ओ. कमिंग्स यांच्या ‘द अमेरिकन रिचर्ड ओ. कमिंग्सआइस हार्वेस्ट्स; ए हिस्टोरिकल स्टडी इन टेक्नॉलॉजी, १८००-१९१८’ या संशोधनपर लेखात याचा उल्लेख आहे. शिवाय म्हटले आहे की, ‘कलकत्त्याला पाठवलेला बर्फ न्यू इंग्लंडच्या थंड हिवाळ्यात मॅसॅच्युसेट्सच्या गोठलेल्या नद्या, तलाव आणि प्रवाहांमधून काढला गेला होता. व्यापाराच्या सुरुवातीच्या काळात, ट्यूडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिक्सेस, छिन्नी आणि इतर तत्सम साधनांचा वापर बर्फ तोडण्यासाठी केला होता. पण लवकरच त्याची जागा घोड्यावर चालवलेल्या कॉन्ट्रॅप्शनने घेतली. किंबहुना अमेरिकेतही ट्यूडर आइस कंपनीला बर्फाच्या जतनासाठी समस्यांना सामोरे जावे लागले होते. म्हणूनच ट्यूडरने हवानामध्ये १८१० मध्ये पहिला आईस डेपो बांधला.’

आणखी वाचा : विश्लेषण: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?

स्थानिक व्यापार प्रतिनिधी

भारतीय उपखंडात बर्फ आयात करणारी ट्यूडर ही एकमेव अमेरिकन कंपनी असली तरी, त्यांनी प्रत्येक शहरामध्ये विक्री आणि साठा यासाठी स्थानिक एजंट नेमले होते. कलकत्त्यात, बोबाजारमधील अक्रूर दत्तांचे कुटुंब त्यांचे कलकत्त्यातील प्रतिनिधी होते. दत्ता हा मूळचा बंगालमधील एक स्लूप व्यापारी होता, जो हुगळीत उत्पादित केलेला निकृष्ट स्लश विकत असे. अमेरिकन बर्फाच्या आगमनानंतर दत्ता यांनी अमेरिकन बर्फ विकण्यास सुरुवात केली. या व्यवसायामुळे दत्ता आणि त्यांच्यासारखे इतर व्यापारी खूप श्रीमंत झाले. मद्रास आणि बॉम्बे (मुंबई) यांसारख्या ठिकाणी जेथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी कार्यरत होती त्या भागात खास करून बर्फाची जतनगृहे उभारण्यात आली.

अमेरिका आणि भारतीय उपखंडातील व्यापारात १८४७ पर्यंत कापसानंतर सर्वाधिक महत्त्व हे बर्फाला आले होते. कारण तो सर्वाधिक खपाचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी माल होता. अमेरिकन सफरचंदाची भारतात निर्यात करण्यासाठीही या बर्फाचा वापर करण्यात आला होता.

त्या काळात घरी बर्फ असणे ही एक विशेषाधिकाराची बाब होती आणि एखाद्याच्या संपत्तीचे प्रदर्शन बर्फाच्या माध्यमातून केले जात असे. त्यामुळे बर्‍याचदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, बर्फ आयातीच्या हंगामात कलकत्त्यामध्ये उच्चभ्रू लोकांकडून ‘आइस्ड शॅम्पेन डिनर’चे आयोजन केले जात असे. सामान्य लोकांसाठी बर्फ खूप महाग होता आणि तितकाच दुर्मिळही. बर्फ मिळविण्यासाठी प्रसंगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासत असे. ईस्ट इंडिया कंपनीने ट्यूडर आइस कंपनीसाठी बर्फाच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली होती, परंतु गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकारी निर्णयात हा विशेषाधिकार १८५३ साली काढून घेण्यात आला.

भारतीयांचे अमेरिकन बर्फाशी असलेले नाते

भारतीयांचे अमेरिकन बर्फाशी असलेले नाते थोडे गुंतागुंतीचे होते. बंगालमध्ये बर्फाचा साठा करण्याच्या कामी भारतीय मजुरांचा वापर करण्यात आला. बर्फाला स्पर्श केल्यावर थंडपणा जाणवत असे. शिवाय त्यातून धूरही येत असे. त्यामुळे बर्फ ही ‘शापित वस्तू’ आहे असे त्यांना वाटले आणि जहाजांमधून बर्फ उतरवण्यासाठी त्यांनी अधिक पैशांची मागणी केली. सर्वसाधारणपणे भारतीय अभिजात वर्ग, ज्यांना बर्फ परवडत होता, त्यांनी बर्फाकडे कुतूहल आणि विशेषाधिकाराची गोष्ट म्हणून पाहिले. स्वामी विवेकानंद यांचे भाऊ महेंद्रनाथ दत्त यांनी केलेल्या नोंदींनुसार, त्यांचे काका चादरीत झाकून बर्फ घेऊन यायचे, हा बर्फ भुशात जतन केला जात होता. सनातनी हिंदूंनी त्याचे सेवन कधीच केले नाही. ‘आम्ही चोरून बर्फ वापरला, त्यामुळेच आमच्या जातीतून पदच्युत झालो नाही.’ असा उल्लेख त्यांनी आपल्या नोंदींमध्ये केला आहे.

नंतरच्या काळात मात्र इंग्रजांनी बर्फ तयार करण्याचा वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. त्यामुळे अमेरिकन बर्फाची मक्तेदारी संपुष्टात आली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाजारातून अमेरिकन बर्फ नाहीसा झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India and american ice trade history svs
First published on: 25-06-2023 at 11:10 IST