History of Shia Islam in Iran: इस्रायलने तेहरानमधील आण्विक तळांवर हल्ला केला आणि इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर इराण आणि इस्रायल संघर्ष समोर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणचा धर्मसत्तेनुसार बदलणाऱ्या इतिहासाचा हा घेतलेला आढावा.

इराणचा इतिहास झरथुस्त्राच्या पारसी धर्माने सुरु होतो. या धर्मात नैतिकता, सत्य आणि अग्नीची उपासना यांना सर्वोच्च स्थान होतं. परंतु, इ.स. ७ व्या शतकात अरब मुस्लिम आक्रमकांनी ससेनियन साम्राज्याचा अस्त करताच या भूमीत इस्लामची मुळे रोवली गेली. ही फक्त सत्तांतराची घटना नव्हती, तर इराणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीच्याच पुनर्रचनेचा तो भाग होता. या भूमीने इस्लामचा स्वीकार केला, परंतु तिचे पूर्वीचे बंध पर्शियन भाषा, काव्य, आणि शिष्टाचार अब्बासी खलिफतीत टिकून राहिले. या ‘इस्लामीकरण’ आणि ‘पर्शियन पुनरुज्जीवन’ यांच्यातूनच इराणने आपली वेगळी वाट शोधली.

सफविद साम्राज्य (१५०१) हे या नव्या परिचयाच्या संघर्षात निर्णायक ठरलं. त्यांनी ‘ट्वेल्व्हर शिया इस्लाम’ला अधिकृत राजधर्माचा दर्जा दिला आणि इराणला सुन्नी बहुल इस्लामी जगतातून विलग केले. इथून पुढे इराणची ओळख केवळ भूप्रदेशावर आधारित राहिली नाही, तर ती शिया पंथाच्या राजकीय अधिष्ठानाशी जोडली गेली.

आज, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य संघर्ष सुरू आहे; त्या संघर्षामागे सामरिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे खोल संदर्भ आहेत. आधुनिक अणुहल्ल्यांपासून ते पारसी साम्राज्याच्या छायेत वाढलेल्या पूर्वगाथांपर्यंत, इराणचा प्रवास समजून घेतल्याशिवाय त्याच्या आक्रमकतेची, अस्मितेची आणि धोरणांची खोल समज होऊ शकत नाही.

इराणच्या इतिहासातील एक निर्णायक वळण म्हणजे सफविद साम्राज्याची स्थापना. या साम्राज्याने ‘ट्वेल्व्हर शिया इस्लाम’ला देशाचा अधिकृत राजधर्म म्हणून स्वीकारले, ज्यामुळे इराणने सुन्नी बहुल इस्लामी जगतातून स्वतंत्र अशी धार्मिक ओळख निर्माण केली. १५०१ मध्ये इस्माईल पहिल्याने सत्ता स्थापल्यानंतर शिया पंथाचा व्यापक प्रसार सुरू केला. सफविद राजांनी शिया इस्लामचा उपयोग केवळ धार्मिक उद्दिष्टांसाठीच नाही, तर इराणच्या राष्ट्रीय परिचयाचे अधिष्ठान घडवण्यासाठी केला. त्यांनी उलेमा वर्गाला अधिकृत मान्यता देऊन, शिया विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या धर्मगुरूंना राज्यसत्तेचा अविभाज्य भाग केले.

Iran Israel conflict
सफविद

सफविद कालखंडात इराणमध्ये कला, वास्तुकला आणि धार्मिक विचारसरणीचा उत्कर्ष झाला. मशहद, इस्फहान आणि काझ्विन यांसारख्या शहरांमध्ये भव्य मशिदी, मदरसे आणि बाजारपेठा उभ्या राहिल्या. फारसी साहित्य आणि काव्यातही शिया प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.

या साम्राज्याने ऑटोमन साम्राज्याशी दीर्घकालीन संघर्ष केला. हा संघर्ष फक्त लष्करी नव्हता तर धार्मिकही होता. शिया-सुन्नी मतभेद या संघर्षामागे खोलवर रुजलेले होते. ताब्रिझ, बगदाद आणि इराकी भागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक युद्धे झाली. या संघर्षांमुळे इराणची शिया ओळख अधिक ठळक झाली. त्यामुळे इराणचा सांस्कृतिक आणि धार्मिक मार्ग पश्चिम आशियाच्या इतर सुन्नी बहुल देशांपासून भिन्न झाला आणि आजच्या काळातही ही वेगळी ओळख कायम आहे.

कजार राजवंश व घटना चळवळ (१७८९–१९२५)

सफविद आणि नादिरशाहच्या काळानंतर, कजार (Qajar dynasty) राजवंशाने १७८९ साली सत्ता स्थापन केली. या काळात पर्शियन सत्ता क्षीण झाली होती. रशिया, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या पश्चिमी देशांनी इराणच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप वाढवला होता. त्यामुळे त्यांनी महत्त्वाचे भूभाग गमावले गेले आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वावर गदा आली.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, इराणी समाजात शिक्षण, आधुनिकतेचा विचार आणि नागरी अधिकार यांची चर्चा सुरू झाली. याचा परिपाक म्हणजे १९०६ ची चळवळ. ही चळवळ इराणच्या इतिहासातील पहिली लोकशाही चळवळ होती. शाही सत्तेवर मर्यादा आणून घटनात्मक राजसत्ता आणि संसद (मज्लिस) स्थापनेची मागणी या चळवळीने केली होती. या चळवळीमुळे आधुनिक राजकीय विचारांची आणि नागरी समाजाची पायाभरणी झाली. माध्यमे, बुद्धिजीवी वर्ग, व्यापारी आणि धर्मगुरूंनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्त्री शिक्षण, मुद्रणयंत्र आणि राजकीय चर्चांचा प्रसार यामुळे एक नवा इराण घडू लागला. कजार राजवटीच्या अखेरच्या टप्प्यात इराण एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा होता. एकुणातच पारंपरिक राजसत्ता आणि नव्या नागरी आकांक्षा यांच्यात संघर्ष अनिवार्य ठरणार होता.

पहलवी कालखंड व आधुनिकतेचे प्रयत्न (१९२५–१९७९)

१९२५ साली कजार राजवटीचा अंत करून रेझा शाह पहलवीने इराणमध्ये पहलवी राजवंशाची स्थापना केली. या काळात इराणमध्ये आधुनिकतेचे धोरण हाती घेण्यात आले. पश्चिमी शहरीकरण, शिक्षण, कायदे व स्त्रियांच्या सहभागासंदर्भात सुधारणा करण्यात आल्या. परंतु, ही सर्व धोरणे हुकूमशाही पद्धतीने राबवली गेली, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषही वाढत गेला. रेझा शाहच्या नंतर त्याचा मुलगा मोहम्मद रेझा शाह पहलवी सत्तेवर आला. त्याच्या काळात अमेरिकेच्या प्रभावाखाली इराणने पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल अंगिकारले. मात्र, धार्मिक व पारंपरिक घटक यास विरोध करत राहिले. या विरोधाचे बीज पुढे क्रांतीत फोफावले. १९५० च्या दशकात मोहम्मद मोसाद्देग याने पंतप्रधानपदावर असताना इराणमधील तेल संपत्तीचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे ब्रिटन व अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी शक्ती अस्वस्थ झाल्या आणि १९५३ मध्ये सीआयएच्या मदतीने मोसाद्देग यांच्याविरुद्ध उठाव करण्यात आला.

Iran Israel conflict
मोहम्मद रेझा शाह पहलवी

पहलवी कालखंडात शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या, पण राजकीय स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यावर बंधनं घालण्यात आली. सावाकद्वारे (गुप्तचर संस्था) विरोधकांचा आवाज दाबण्यात आला आला. एकीकडे आधुनिकतेची घोषणा आणि दुसरीकडे दडपशाही यामुळे इराणमधील अनेक वर्गांमध्ये नाराजी होती. धार्मिक नेते, विद्यार्थी, मध्यमवर्ग आणि कामगार यांच्यात वाढती असमाधानाची भावना शेवटी १९७९ च्या इस्लामिक क्रांतीचे मूळ ठरली.

१९७९ ची इस्लामिक क्रांती व इस्लामिक रिपब्लिक

  • १९७९ ची क्रांती ही फक्त राजसत्तेचा बदल घडवणारी नव्हती, तर या क्रांतीने इराणची संपूर्ण ओळख, शासनपद्धती आणि सामाजिक रचनेचा कायापालट केला. ही क्रांती अनेक घटकांच्या एकत्रित असंतोषातून उद्भवली.
  • पहलवी राजवटीची हुकूमशाही आणि अभिव्यक्तीवरील बंधने, धार्मिक नेतृत्वचा वाढता विरोध, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रांचा राजकीय हस्तक्षेप व सांस्कृतिक प्रभाव यामुळे इराणने अधिकच वेगाने क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकली. अयातुल्ला खोमेनी हे क्रांतीचे सर्वोच्च नेतृत्व ठरले. त्यांनी ‘विलायते फकीह’ (Islamic Guardianship of the Jurist) या तत्त्वज्ञानाच्या आधारे clerical rule म्हणजेच धर्मगुरूंनी चालवलेली शासनप्रणाली तयार केली. याच विचारांवर आधारित इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची स्थापना झाली.
  • क्रांतीनंतर लवकरच इराण-इराक युद्ध (१९८०–८८) सुरू झाले. सद्दाम हुसेनने शिया वर्चस्व असलेल्या नव्या इराणी राज्याच्या विरोधात युद्ध पुकारले. हे युद्ध आठ वर्षे चालले आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था व समाजावर खोल घाव घालून गेले.
  • क्रांतीनंतर इराणमध्ये एक नवीन राज्यघटना अस्तित्वात आली; यात सर्वोच्च नेत्याला अत्यधिक अधिकार देण्यात आले. संसद, अध्यक्षपद आणि न्यायव्यवस्था यांची रचना जरी कायम राहिली, तरी त्यांचे कार्य शिया धर्मगुरूंनी ठरवलेल्या धार्मिक व्याख्या आणि नैतिक चौकटीच्या मर्यादेतच सुरू राहिले. या टप्प्यावर शिया धर्मसत्ता इराणच्या केवळ धार्मिक व्यवस्थेपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती राजकीय आणि सांस्कृतिक संरचनेचा गाभा ठरली. यामुळे इराणने इस्लामी जगात स्वतःची एक वेगळी आणि परिणामकारक (शिया) ओळख निर्माण केली जी आजही जागतिक भू-राजकारणात निर्णायक प्रभाव टाकत आहे.

२१ व्या शतकातील इराण

२१व्या शतकात इराण जागतिक राजकारणात एक तणावनिर्मिती करणारी आणि परिणामकारक शक्ती म्हणून पुढे आला आहे. त्याचा अणुकार्यक्रम हा जागतिक चर्चा आणि वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिका व युरोपियन देशांच्या मते इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर इराणचा दावा आहे की, त्यांचा कार्यक्रम पूर्णतः शांततेच्या उद्देशाने आहे. २०१५ साली झालेला ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ (JCPOA) हा महत्त्वाचा करार होता, परंतु अमेरिकेने २०१८ साली या करारातून माघार घेतल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला.

सद्यस्थितीत इराणमधील अंतर्गत राजकारणात तरुण आणि महिलांचा वाढता विरोध निर्णायक ठरतो आहे. २०२२ साली महसा अमिनीच्या मृत्यूनंतर उफाळलेली चळवळ ही धार्मिक कायद्याविरोधात, विशेषतः महिलांवरील बळजबरीच्या पोशाखनियमांविरोधात उभी राहिलेली तीव्र प्रतिक्रिया होती. हा संघर्ष केवळ रस्त्यावर मर्यादित न राहता डिजिटल पातळीवरही लढला जात आहे. सोशल मीडिया, व्हीपीएन, ब्लॉग्स आणि एन्क्रिप्टेड चॅनेल्सच्या माध्यमातून सरकारविरोधी भावना आणि माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे. त्याविरोधात सरकारने इंटरनेटवर बंदी, गुप्तचर साधने आणि अटकसत्रांच्या माध्यमातून दडपशाही अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर आजचा इराण हे ‘विलायते फकीह’वर आधारित धर्मसत्तावादी व्यवस्थेच्या आणि आधुनिक, मुक्त, लोकशाहीवादी समाजाच्या आकांक्षांतील संघर्षाचे अत्यंत स्पष्ट उदाहरण ठरतो आहे. या दोन प्रवाहांतील संघर्षच इराणच्या राजकीय आणि सामाजिक भविष्याचे खरे स्वरूप ठरवणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा केवळ अणुकार्यक्रम, सुरक्षा, धोके वा राजकीय असहमतीपुरता मर्यादित नाही. हा संघर्ष अनेक शतकांची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामरिक साखळी घेऊन समोर उभा आहे. इराणची शिया-बहुल ओळख, त्याचा पर्शियन वारसा, पश्चिमी राष्ट्रांविषयीचा अविश्वास आणि इस्लामिक क्रांतीनंतर निर्माण झालेला धार्मिक राष्ट्रवाद..हे सर्व या संघर्षाच्या गाभ्यात आहेत. त्यामुळे इराणला समजून घ्यायचं असेल, तर केवळ त्याच्या अलीकडच्या धोरणांना नव्हे, तर त्याच्या इतिहासाला, अस्मितेला आणि त्यातील असंतुलनाच्या मुळाशी पोचणं आवश्यक आहे.